शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित, शेकडो एकर जमीन नापीक
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील शेती ही समुद्र किंवा खाडीकिनारीच असून समुद्राच्या भरतीच्या पाण्यापासून शेतीचे संरक्षण करणारी बांधबंदिस्ती कमकुवत झाल्याने दरवर्षी शेकडो एकर पिकती शेतजमीन नापीक होत आहे. याकडे संबंधित विभाग तसेच प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे नुकसानभरपाईची मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे उरणच्या खोपटा खाडीपलीकडील शेतकर्यांकडून संताप व्यक्तकेला जात आहे. नुकतेच होळीच्या मोठया उधाणात काही भागांत पाणी शिरले होते.
तालुक्यातील शेती ही एकपिकी आहे. त्यातही समुद्राच्या उधाणाच्या पाण्याचा सर्वाधिक धोका या जमिनीला आहे. येथील पश्चिम विभागात केगाव, नागाव व काही प्रमाणात चाणजे येथे शेतजमीन आहे, तर उर्वरित भागात औद्योगिकीकरणामुळे शेती नष्ट झाली आहे. मात्र खोपटा खाडीपलीकडे आजही जवळपास अडीच ते तीन हजार हेक्टर जमिनीवर भातपीक घेतले जात आहे. यातील आवरे ते खोपटे व खोपटे ते धुतूम अशी पंधरा ते वीस किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या खाडीकिनार्यावर हजारो एकर जमीन आहे. या जमिनीचे समुद्राच्या खार्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी स्वत: मेहनत घेत बांधबंदिस्ती करीत होते. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शेतीत शिरत असल्याने शेती नष्ट होत असून त्यात जर खारफुटीच्या बिया वाहून आल्या व त्या रुजल्या तर शेतकर्यांवर आपल्या जमिनीच गमावण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
दोन्ही विभागांचे दुर्लक्ष
समुद्राच्या भरतीमुळे शेतीचे नुकसान झाले असेल तर त्याची तक्रार महसूल विभागाकडे केल्यास कृषी विभागाकडून त्याची पाहणी करून नुकसानभरपाई मिळू शकते. मात्र याकडे दोन्ही विभागांचे दुर्लक्ष असल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहिला आहे.