। जळगाव । प्रतिनिधी ।
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक असली तरी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ती स्थानिक मुद्यांवर आणून ठेवली आहे. भाजपकडून नियोजनबद्धरित्या राष्ट्राचा विकास व मोदींचे नेतृत्व या मुद्यांवर ‘फोकस’ केला जात असून भाजपच्या खासदारांनी काय केले, हा मुद्दा महाविकास आघाडीकडून पुढे केला जात आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निवडणुकीला ‘नॅशनल’अन् ‘लोकल’चा रंग चढत आहे.
जळगाव जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. पूर्व विभागात रावेर लोकसभा क्षेत्र, तर पश्चिम जळगाव जिल्ह्याचा भाग म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघांची भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय रचनाही भिन्न आहे. तशी ती प्रत्येकच मतदारसंघाची असते. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ एकाच जिल्ह्यातील असूनही ही रचना भिन्न असण्याची अनेक कारणे आहेत. पूर्व जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्र तापी पट्टा म्हणून समृद्ध असल्याचा दावा केला जातो. तर पश्चिम जळगाव जिल्ह्याचा जळगाव लोकसभा क्षेत्राचा बहुतांश परिसर गिरणा पट्ट्यातला असून तो प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्राचा समजला जातो. स्वाभाविक या दोन्ही भागातील शेतीचे व अन्य प्रश्न भिन्न आहेत. परंतु, या दोन्ही मतदारसंघांचा राजकीय दृष्टीकोनातून विचार केला तर एक भाग समान आहे आणि तो म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार सातत्याने निवडून आले आहेत. असे असले तरी, यंदाची निवडणूक या दोन्ही ठिकाणी विविध मुद्यांवर लढवली जात आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार असलेल्या उन्मेश पाटलांना उमेदवार नाकारुन स्मिता वाघांना ती दिली. त्यामुळे पाटील नाराज होऊन त्यांनी शिवसेना ‘उबाठा’त प्रवेश करत त्यांचे मित्र करण पवारांना उमेदवारी मिळवून आणली. आता ते पवारांच्या प्रचारात उतरले आहेत. भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा मुद्दा समोर करुन उन्मेश पाटलांनी मंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर थेट टीका करत आक्रमणाचा पवित्रा अवलंबला. भाजपकडून पाटलांना वेळेपुरते उत्तर देण्यात आले. उन्मेश पाटलांसह करण पवार, शिवसेना उबाठाचे संपर्कप्रमुख संजय सावंत हे निवडणुकीचा प्रचार किंवा प्रचारातील आरोपांची धार स्थानिक मुद्यांशी जोडताना दिसत आहेत. भाजपकडून मात्र राष्ट्राचे नेतृत्व कुणाच्या हाती देणार? हा थेट देशाशी निगडीत प्रश्न विचारुन मतदारांच्या भावनांना हात घातला जात आहे. त्यासाठी मोदींनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखाही मांडला जात आहे.
रावेर मतदारसंघातील स्थिती फारशी वेगळी नाही. या मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे भाजपकडून सलग तिसर्यांदा मैदानात आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात रक्षा खडसेंच्या वतीने दहा वर्षांत झालेली कामे, देशभरात मोदींच्या नेतृत्वात झालेले कार्य, कणखर व सक्षम नेतृत्व असे मुद्दे मांडले जात असून पाटील यांच्याकडून मतदारसंघात रक्षा खडसेंनी काय केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही निवडणूक देशाचे नेतृत्व कुणी करावे, हे ठरविणारी आहे. आता स्थानिक मुद्दे आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या विषयावरुन मतदार नेमके कोणत्या पक्षाकडे कौल देतात, उमेदवाराला महत्त्व दिले जाते की नेतृत्वाला. नवख्या उमेदवारांना कौल मिळतो, की राजकारणात अनुभवी महिला उमेदवारांना, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..