तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली लूट?

घाम गाळणारा शेतकरी कोरडाच; मधल्या दलालांचा कोट्यवधींचा खेळ

| उरण | प्रतिनिधी |

‌‘तिसऱ्या मुंबईसाठी 216 एकर भूसंपादन’ या गाजावाजाच्या वृत्तामागे शेतकऱ्यांची उघड दिशाभूल आणि फसवणूक लपलेली असल्याचा संतापजनक आरोप पुढे आला आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या व्यवहारात बिल्डर आणि यंत्रणा एकाच साखळीत गुंतल्याची चर्चा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यात काही वर्षांपूर्वी एका बिल्डरने ‌‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखवत शेकडो एकर जमीन कवडीमोल दरात ताब्यात घेतली होती. आज त्याच जमिनींना सोन्याचा भाव देत सरकार अथवा एमएमआरडीएकडून विकत घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांकडून 1 ते 1.5 लाख रुपये प्रति गुंठा दराने घेतलेल्या जमिनी आता 25 ते 30 लाख रुपये प्रति गुंठा दराने विकल्या गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. म्हणजे घाम गाळणारा शेतकरी कोरडाच, आणि मधल्या दलालांचा कोट्यवधींचा खेळ सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, एसईझेड किंवा खासगी व्यवहारातून विकलेल्या जमिनी एमएमआरडीएच्या नावावर करून ‌‘शेतकऱ्यांची संमती मिळाली’ असा बनाव उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. कागदोपत्री खेळ करून वास्तव झाकण्याचा हा डाव असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

एसईझेडसाठी संपादित करण्यात आलेल्या पेण व दादर परिसरातील सुमारे 1 हजार एकर जमिनींचा या प्रक्रियेत समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या जमिनींपैकी मोठा भाग सध्या खारफुटीने व्यापलेला असतानाही त्याचा वापर व्यवहारासाठी केला जात असल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळत असून, विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. काही वृत्त पेड न्यूजच्या माध्यमातून वातावरण तयार करण्यासाठी पसरवल्या जात असल्याचीही चर्चा असून, नागरिकांनी अशा बातम्यांवर आंधळा विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेतकरी व त्यांच्या प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version