मधु दंडवते आदर्शवत नेतेः आ. जयंत पाटील

| मुंबई | प्रतिनिधी |

मधु दंडवते एक आदर्शवत नेते होते. धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची पताका त्यांनी नेहमीच आपल्या खांद्यावर घेतली होती. समाजात दुही माजविणाऱ्या राजकारणाला त्यांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जातीवादीशक्तीचा पराभव करणे, इंडिया आघाडीला एकजूट करणे हीच खरी मधु दंडवते यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, माजी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला आणि इतर पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे आ. जयंत पाटील म्हणाले, मधु दंडवते हे नगरचे असले, तरीदेखील त्यांची राजकीय कारकीर्द कोकणात घडली आहे. कोकणाला मुंबईशी जोडण्यासाठी आणि इथला माणूस मुंबईत न जाता कोकणातच स्थिरावण्यासाठी त्यांनी कोकण रेल्वे आणली. ते अर्थ व रेल्वेमंत्री होते. कोकण रेल्वे उभारण्यासाठी त्यांनी कर्जरोखे काढले होते. ते रोखे विकण्यासाठी मागणी केली होती. त्यावेळी बँकेची उलाढाल कमी असल्याने त्यांना विरोध केला. त्यावेळी त्यांनी ‌‘प्रभाकर पाटील यांनी जनतेच्या हितासाठी काम केले आहे. तू त्यांचा मुलगा आहेस, तुला काहीच अशक्य नाही. कोकणच्या विकासासाठी रेल्वे गंगोत्री ठरणार आहे, तुझा हातभार लागला पाहिजे,’ असे त्यांनी मोठ्या विश्वासाने सांगितले. वडीलकीच्या नात्याने त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे पाच कोटी रुपयांचे कर्ज रोखे घेतले. दंडवते एक आदर्श व्यक्ती होते. त्यांच्याबद्दल कायम आदर होता. ते प्रचंड विद्वान होते. ते अर्थमंत्री असताना, शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी काय तरतूद केली, याचा या घटकाला कसा फायदा होईल, हे त्यावेळी समजावून सांगत होते. भ्रष्टाचाराचा लवलेश नसलेला, निर्मळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणजे दंडवते, असे गौरवोद्गार आ. जयंत पाटील यांनी काढले.

जुन्या आठवणींना उजाळा
मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमात शरद पवारांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, मला आनंद आहे की, अनेक सहकाऱ्यांनी मधु दंडवते यांचा सन्मान केला. त्यांच्यासोबत अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर काम केलं. दंडवते हे अहमदनगरचे असले तरी कोकणातील नेते झाले. 1971 साली ते विधान परिषदेत आले. आम्ही विधानसभेतील काही लोक आवर्जून परिषदेत जाऊन त्यांची भाषण ऐकत असू. देशाचे अर्थमंत्री दंडवते यांना कार विकत घ्यायची होती. त्यावेळी त्यांनी बँकेत जाऊन अर्ज केला होता. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र, मुंबईचा संघर्ष, गोवा मुक्ती आंदोलन अशा अनेक विषयांत लक्ष घातलं होतं. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, त्यानंतर त्यांना कॅन्सर झाला. निधनापूर्वी त्यांनी लिहून ठेवलं होत की, माझ्याकडे जे काही आहे, ते मेडिकल कॉलेजला द्यावं, असे शरद पवार पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर पवारांचं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होऊ शकत नाही, असं काही लोक म्हणतात. पण, रस्ता निघत असतो. 1977 साली काय परिस्थिती होती? तेव्हा कोणी चेहरा नव्हता. तेव्हा लोकांनी चेहरा न पाहता उमेदवार निवडून दिलेत, असं त्यांनी सांगितलं.
Exit mobile version