आयुष्यमान भारतमध्ये महाराष्ट्र 12 व्या स्थानावर

| मुंबई | वृत्तसंस्था |

आरोग्य सेवा नागरिकांच्या आवाक्यात यावी, तसेच त्यांच्यावर स्वस्तात उपचार व्हावेत यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून नावारुपाला आली असून या योजनेंतर्गत मागील चार वर्षांमध्ये तब्बल 4 कोटी 98 लाख 2 हजार 959 नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त 9 लाख 49 हजार 329 नागरिकांनीच लाभ घेतला असून, या योजनेचा लाभ घेण्यामध्ये महाराष्ट्र देशात 12 व्या स्थानकावर आहे.

देशातील मध्यम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 12 कोटी नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी सप्टेंबर 2018 मध्ये ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मधुमेह, कर्करोग, हृदय रोग यासह विविध आजारांवर उपचार करण्यात येतात. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाखांपर्यंतच आरोग्य सुरक्षा पुरविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मागील चार वर्षांमध्ये लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 2020-21 मध्ये देशामध्ये 70 लाख 6 हजार नागरिकांनी लाभ घेतला होता. तर 2023-24 मध्ये लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 19 लाखावर पोहोचली आहे.

देशातील लाभार्थ्यांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत फारच धीम्या गतीने वाढत आहे. तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. महाराष्ट्रामध्ये मागील चार वर्षांमध्ये 9 लाख 49 हजार 329 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्रातील 208 सरकारी रुग्णालयांसह 836 खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, असे असताना आजही अनेक नागरिक या योजनेपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे.

Exit mobile version