| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून संघर्षशील नेतृत्वांचा उदय झाला त्याप्रमाणेच आपल्या रायगड जिल्ह्यात सुद्धा भाऊ म्हणून परिचित असलेले प्रभाकर नारायण पाटील नावाचे एक झंझावात उदयास आले. लहानपणापासूनच संघर्षाचे प्रखर अस्त्र मिळालेले प्रभाकर पाटील हे आपल्या कार्याने रायगडचेच नाही तर कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाऊ लागले. कष्टकरी, शेतकरी तसेच जनसामान्यांचा आधारवड असलेले, गोरगरिबांचे कैवारी, हाडाचे पत्रकार असणारे प्रभाकर पाटील सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीचे जनक मानले जाऊ लागले. प्रशासनावर पकड असलेले भाऊंनी रायगड जिल्ह्यात शिक्षण, आरोग्यावर विशेष भर दिला. कबड्डी, क्रिकेट तसेच अनेक मैदानी खेळांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या खेळा वरील प्रेमाला आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पीएनपी चषकाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
![](https://krushival.in/grygrars/2024/01/img-20240124-wa00046528637254539201273-1024x682.jpg)
अलिबागमधील वेश्वी येथील मॅपल आयव्ही हॉटेलमधील सभागृहात बुधवारी पीएनपी चषकाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती चित्रलेखा पाटील यांनी दिली. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, सुरेश घरत, संदीप जगे, सुरेश घरत, पल्लवी नायर, विक्रांत वार्डे, अमोल नाईक, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, प्रमोद घासे, आदींसह सर्व संघ मालक, पीएनपी चषक कोअर कमिटी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट खेळाला मिळालेली व्याप्ती आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी त्यांना दर्जेदार आणि व्यावसायिक व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) मिळण्याच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धा विशेषतः ग्रामीण भागातील या सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांच्याकरीता ही स्पर्धा आयोजित करणे अत्यावश्यक आहे या दृष्टीकोनातूनच भारतीय शेतकरी कामगार पक्ष, पीएनपी ग्रुप, जिल्हा महिला आघाडी तसेच पुरोगामी युवक संघटना, चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग, रोहा, मुरूड या तीन तालुक्यांसाठी टेनिस क्रिकेटपटूंसाठी दर्जेदार आणि व्यावसायिक टेनिस क्रिकेट स्पर्धा दिनांक 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील आझाद मैदानामध्ये भाऊंच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पीएनपी चषक या नावाने आयोजित केली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये वर उल्लेख केलेल्या तिनही तालुक्यातील 24 संघ खेळणार असून त्यामध्ये तब्बल 336 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेकरीता चार संघांचा एक गट निश्चित केला जाणार असून एकूण 6 गटांमधून 6 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. विशेष म्हणजे पाच दिवस आयोजित केलेली ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवरती दिवस-रात्र प्रकारामध्ये खेळविली जाईल. विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेटपटूंना खेळण्याचा अनुभव मिळावा आणि त्यातून भविष्यातील भारतीय संघात या खेळाडूंचे स्थान निश्चित व्हावे अथवा त्यांना संधी मिळावी हा प्रामाणिक दृष्टीकोन ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धांकरीता अलिबाग तालुक्यातील सात, मुरूड तालुक्यातील दोन आणि रोहा तालुक्यातील एक अशा 10 जिल्हा परिषद मतदारसंघातून आणि अलिबाग आणि मुरूड शहरामधून सर्व एकत्रित खेळाडूंची लिलाव (ऑक्शन) पद्धतीने निवड केली जाणार आहे. प्रत्येक संघांमध्ये 14 खेळाडूंचा समावेश असणार असून या स्पर्धेची पारितोषिके आजवर जिल्ह्यात आयोजित केलेल्या स्पर्धांपेक्षा सर्वाधिक रकमेची आणि आकर्षक स्वरूपाची असणार आहे.
स्पर्धेमधून तीन संघांना पारितोषिके देऊन गौरविले जाणार असून त्यांच्यासमवेत संघमालक, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्तम यष्टिरक्षक, सर्वोत्तम 40+ खेळाडू अशा विविध प्रकारांमध्ये वैयक्तिक आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेतील खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेकरीता ऑनलाईन लिंक तयार करण्यात आलेली असून खेळाडूंना रजिस्ट्रेशनची अंतिम मुदत ही 31 जानेवारी पर्यंत असणार आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये तालुक्यामधून तब्बल 1000 पेक्षा अधिक खेळाडूंचे रजिस्ट्रेशन केले जाणार असून दि. 8 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑक्शन सोहळा आपल्याला अलिबागमध्ये अनुभवायला मिळणार आहे. याकरिता मुंबईस्थित अल्टिमेंट इव्हेंट मेकर ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी याची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे. या स्पर्धेमध्ये तीनही तालुक्यातील टेनिस क्रिकेटसाठी तसेच लेदर क्रिकेटसाठी ज्यांनी भरपूर योगदान दिले आहे अशा खेळाडूंना गौरवित करण्यात येणार असून स्पर्धेच्या पाचही दिवस विशेष सांस्कृतिक आणि खेळाशी निगडीत असणारे अनेक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच राज्यातील नामवंत समालोचकांसमवेत स्थानिक समालोचक या स्पर्धेत पहायला मिळणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील हे उपस्थित राहणार असून यांच्यासमवेत मा. राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, मा.आ. पंडित पाटील, मा.आ. बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, मा.नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उद्योजक नृपाल पाटील तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे या मतदारसंघातील आजी-माजी सरपंच, सदस्य तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील भव्य दिव्य गॅलरी उभारण्यात येणार असून स्पर्धा अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीकोनातून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात करण्यात येणार आहे. तसेच मैदानामध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून मैदानाच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांना देखील या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. महिला व शालेय विद्यार्थ्यांकरीता विशेष राखीव गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार आहे. त्यांच्यासमवेत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ.पंडित पाटील, माजी आ.बाळाराम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड.आस्वाद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उद्योजक नृपाल पाटील तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे या मतदारसंघातील आजी – माजी सरपंच, सदस्य तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत दिवस -रात्र स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा दुपारी बारा वाजल्यापासून सुरु होणार आहेत.
8 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव (ऑक्शन)
स्पर्धेतील खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेकरीता www.pnpchashak.com ही ऑनलाईन लिंक तयार करण्यात आली आहे. खेळाडूंना नोंदणीची अंतिम मुदत ही 31 जानेवारीपर्यंत असणार आहे. या प्रक्रियेमध्ये तालुक्यामधून तब्बल एक हजारहून अधिक खेळाडूंची नोंदणी केली जाणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा लिलाव (ऑक्शन) सोहळा अलिबागसह संपूर्ण रायगडकरांना अनुभवायला मिळणार आहे. यासाठी मुंबईस्थित ‘अल्टिमेंट इव्हेंट मेकर’ ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी याची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे. इस्ट्राग्रामवर नोंदणीपासून लिलाव प्रक्रीया आणि खेळाडूंची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
पाच दिवस विविध उपक्रम
या स्पर्धेमध्ये तिन्ही तालुक्यातील टेनिस क्रिकेटसाठी आणि लेदर क्रिकेटसाठी ज्यांनी भरपूर योगदान दिले आहे, अशा खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असून स्पर्धेच्या पाचही दिवस विशेष सांस्कृतिक आणिखेळाशी निगडीत असणारे अनेक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच राज्यातील नामवंत समालोचकांसमवेत स्थानिक समालोचक या स्पर्धेत पहायला मिळणार आहेत.
भव्य दिव्य प्रेक्षक गॅलरी विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील भव्य दिव्य गॅलरी उभारण्यात येणार आहे. स्पर्धा अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच घरबसल्या स्पर्धा पहाता यावी यासाठी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून घराघरात करण्यात येणार आहे. मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून मैदानाच्या बाहेर असणार्या प्रेक्षकांना देखील या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. महिला व शालेय विद्यार्थ्यांकरीता विशेष राखीव गॅलरी उभारण्यात येणार आहे.
स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न- चित्रलेखा पाटील
प्रभाकर पाटील कोकणचे भाग्यविधाते होते. कष्टकरी शेतकरी व जनसामान्यांचे अधारवड असलेले प्रभाकर पाटील यांनी विविध क्षेत्रात काम केले आहे.सर्वच क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले आहे. कबड्डी, क्रीकेट या मैदानी खेळालादेखील त्यांनी प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या खेळावरील प्रेमाला आणि स्मृतीला उजाळा देण्यासाठी पीएनपी चषकाचे अनावरण केले आहे. टेनिस क्रिकेटला पसंती वाढली आहे. त्या दृष्टीने भुतो व भविष्यतो अशा पध्दतीने ही स्पर्धा भरविली जाणार आहे. गावागावात अनेक खेळाडू तयार झाले आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून हक्काचे व्यासपिठ मिळावे यासाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतला असून महिलांसाठीदेखील भविष्यात क्रिकेटच्या स्पर्धा घेण्याचा मानस आहे. ही स्पर्धा वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यातून अलिबागचे महत्व अधिक वाढविण्याचा एक प्रयत्न राहणार आहे.