कृषीवलच्या दणक्याने महावितरणला जाग

शेतकर्‍याच्या घराकडे जाणारा विजेचा खांब बदलला

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायतीमधील ममदापूर गावातील शेतकर्‍यांच्या घराकडे जाणारा विजेचा खांब जुलै महिन्यात अर्धवट अवस्थेत कोसळला होता. त्या विजेच्या खांबाची दुरुस्ती महावितरणकडून करण्यात येत नव्हती. मात्र, कृषीवल मध्ये याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यावर अगदी दुसर्‍याच दिवशी विजेचा नवीन खांब आणून आणि तो तात्काळ उभा करून घेतला. त्यामुळे त्या गावातील शेतकर्‍यांना घरी जाण्यासाठी निर्माण झालेला विजेचा धोका कमी झाला आहे.

ममदापूर गावातील धुळे कुटुंबियांच्या घराकडे जाणारा रस्त्यावर शेताच्या बांधावर असलेला विजेचा खांब 14 जुलै रोजी वादळी वार्‍यात अर्धवट अवस्थेत कोसळला होता.त्याबाबत स्थानिक रहिवाशांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या होत्या. मात्र, महावितरणकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते रोशन शिंगे यांनी प्रसारमाध्यमे यांना संपर्क केला. याप्रकरणी कृषीवलमध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले आणि तात्काळ महावितरणकडून कार्यवाही झाली आणि संध्याकाळपर्यंत धुळे कुटुंबियांच्या घराकडे जाणारा विजेचा खांब नव्याने उभा करून देण्यात आले. वृत्तपत्राची दखल घेऊन महावितरणने नवीन विजेचे खांब आणून उभे करून वीज प्रवाह सुरु केल्याने महावितरणला जाग आली आहे.

Exit mobile version