महावितरणची १३९ वीजचोरांविरुद्ध कारवाई

| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणच्या कल्याण पश्‍चिम विभागातील मोहने वीज वाहीनीवरील वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात या वाहिनीवरील 149 वीज चोरट्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून 41 लाख 57 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या भागात वीज चोरांविरुद्धची कारवाई निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

मोहने वीजवाहिनी क्रमांक सातद्वारे वडवली, अटाळी, आंबिवली, नवनाथ नगर, संतोषीमाता तसेच आंबिवली स्टेशन या परिसरास वीज पुरवठा केला जातो. कल्याण पश्‍चिम विभागात या वाहिनीची वीजहानी सर्वाधिक आहे. ही वीजहानी कमी करण्यासाठी उच्चदाब व लघुदाब तारा बदलणे, पोलवरील अतिरिक्त सर्विस वायर काढणे, निकामी मीटर बदलणे आणि वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यात वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार 139 वीज चोरांवर कारवाई करून 41 लाख 57 हजार 870 रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक देण्यात आले आहे. विहित मुदतीत वीजचोरीच्या देयकाचा भरणा न करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. घरात मिटरच्या इनकमिंग वायरला जॉईंट असणे, मिटर बायपास करणे, मिटरचे एम-सिल तोडणे, मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दीगंबर राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा व सुलभ पद्धतीने उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घेऊन वीजवापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Exit mobile version