| चिरनेर | प्रतिनिधी |
हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या मानिवली येथील जन्मगावी 112 व्या जयंतीचे सोमवारी (दि.19) आयोजन करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हिराजी गोमाजी पाटील यांच्या जयंतीचा सोहळा आगरी समाज संघटनेच्या वतीने थाटात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्र घरत यांच्या समाजकार्याची दखल घेत, कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने त्यांना आगरी समाज भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
महेंद्र घरत सत्काराला उत्तर देताना, समाजातील प्रत्येक गरजूंसाठी सहकार्याची भूमिका कायम असल्याचे सांगितले. त्यांनी गेली 38 वर्षे सामाजिक काम करत हजारोंच्या हातांना काम दिले. शेकडो गरीब-गरजूंना घर बांधकामासाठी मदत केली. रुग्णांसाठी तर ते देवदूतासमान काम करीत आहेत. शेकडो विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्चही उचललेला आहे. ज्या पालकांना लाखो रुपये फी भरून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेता येत नाही, त्यांच्यासाठी आईच्या नावाने यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्था स्थापन करून अत्यल्प फी घेऊन शाळा आणि ज्युनियर महाविद्यालय चालवले जाते. संगणक आणि रुग्णवाहिकांचे वाटप आज घडीलाही सुरू असल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेने महेंद्र घरत यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. आगरी समाजात जन्मलेल्या या दानशूर व्यक्तिमत्वाला आगरी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे, परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







