माहेरवाशिणींचा स्नेहमेळावा उत्साहात

। माणगाव । प्रतिनिधी ।

आजचे जग हे खूप गतिमान आहे. या गतिमान जगात एकमेकांना भेटण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. त्यात महिला तर कामात अतिशय व्यस्त असतात. पती, मुलं, सासू, सासरे, घरातील कामे यातच महिलांचे आयुष्य निघून जात असते. पुरुष एक वेळ मित्रांना भेटू शकतात, मात्र विवाहानंतर महिलांना माहेरीची फार ओढ असली तरी सासर आणि संसाराच्या जबाबदारीमुळे मनासारखं माहेरपण उपभोगता येत नाही. बालमित्र मैत्रिणींसही संपर्कही ठेवता येत नाही. त्यामुळे सगळं असूनही त्यांना हरवल्यासारखं वाटतं. अशातच माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड गावातील माहेरवाशिणींचा स्नेहमेळावा शनिवार, दि. 12 ऑगस्ट रोजी वाकडाई उतेखोल माणगाव येथील रिव्हरलँड रिसोर्ट येथे भरला होता. हा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.

प्रदीर्घ काळानंतर बालमैत्रिणी एकत्र जमल्याने सर्वजणी आपल्या बालपणीच्या आठवणीत रमल्या होत्या. अनेकजणी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत भारावून गेल्या. तेव्हाची परिस्थिती हलाकीची असली तरी बालपण मात्र सुखात गेलं. आताच्या पिढीला तसं बालपण जगायला मिळत नाही. खांदाड येथेच पुन्हा एकदा बालपण अनुभवायला मिळावे, अशी अनेकींनी इच्छा व्यक्त केली. यावेळी नैना यादव, बाली यादव, साधना यादव, सुवर्णा यादव, अपर्णा घर्वे, बाली शेलार, मिनू शेलार, अर्चना शेलार, अश्‍विनी शेलार, शितल घर्वे, पिंकी घर्वे, उज्वला कदम, माधवी कदम, कविता सावंत, पिंकी सावंत, मानसी दळवी, अपूर्वा दळवी, पूनम कनोजे, भारती कनोजे, आशा सांगले, सुनीता पवार, पिंकी साबळे, सविता शिंदे, बंटी साबळे, सुजा पाटील, शैला जाधव, बाली साबळे आदी खांदाड माहेरवाशिणी उपस्थित होत्या. पुन्हा एकदा भेटू असे एकमेकींना वचन देत उत्साहपूर्ण वातावरण एकमेकींचा निरोप घेतला.

Exit mobile version