1 लाख वृक्षाचा आकडा पार, 6 दरडग्रस्त गावात बांबू लागवडीने विनणार जाळे
। माणगाव । सलीम शीख ।
वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी शासन कठोर पाऊल उचलत आहे. पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच सामाजिक संस्था, संघ, पर्यावरणप्रेमी आपापल्या क्षेत्रात प्रगतीशील काम करत आहेत. दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढ हि देशाची समस्या बनली आहे. रायगड जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. मात्र वाढत्या वणव्यामुळे इथली झाडे, झुडपे नष्ट होत आहेत. त्याचा परिणाम जंगलातील पशु, पक्षी, प्राण्यांवर होत आहे. दरवर्षी शासन पावसाळ्यात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करते. त्यांपैकी कांही झाडे जगतात. तर कांही मरतात. त्यातच वणव्याचाहि फटका त्यांना बसतो. निसर्ग व जमिनीचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे. माणगाव तालुक्यात यंदाचे वर्षी 1 लाखाहून अधिक वृक्ष लागवड करून उच्चांक गाठला आहे. तर 6 दरडग्रस्त गावात बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करून डोंगर व जमिनीची होणारी धूप थांबव्यासाठी बांबूच्या बेटांनी जाळे विनण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार व प्रभारी कृषी अधिकारी अशोक मारकड, कृषी विस्तार अधिकारी शिवदत्त परजणे तसेच माणगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. माणगाव पंचायत समितीने यंदाचे वर्षी 60 हजार झाडांची रोपे उपलब्ध करून दिली आहेत. एका ग्रामपंचायतीला 790 रोपे लागवडीचे उदिष्ट दिले होते. माणगाव तालुक्यात 74 ग्रामपंचायती व 1 नगरपंचायत आहे. त्यादृष्टीने नियोजन करून वृक्ष लागवड करण्यात आली. ही रोपे पहेल येथील सामाजिक वनीकरण रोपवाटिका येथील नर्सरीतून आणून त्या रोपांची लागवड केली आहे. यात जंगली, सावली, फळ, कारंज, सीताफळ, कांचन, गुलमोहर, आंबा, काजू अशी विविध रोपांची लागवड केली आहे. तर माणगाव तालुक्यातील 6 संभाव्य दरडग्रस्त गावे पहेल, गारळ, आडघर, रेपोली, न्हावे, टोळखुर्द हि सहा गावे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांनी जाहीर केलेली हि गावे संभाव्य दरडग्रस्त असून या गावात स्थानिक नर्सरीतून बांबूची रोपे न घेता भोर, पुणे येथील नर्सरीतून सुधारित बांबूची जात थाई तुल्डा, इंडियन तुल्डा या दोन्ही जातीची हि झाडे 3 वर्षीची असून सुमारे 7 ते 8 फुट उंचीची आहेत. याची लागवड केली जाणार आहे.
वनविभागाने यंदा 45 हजार विविध झाडांची लागवड शासनाच्या वनविभाग व मुंबई – गोवा महामार्गालगतच्या जागेत केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे तसेच जीर्ण झालेली अनेक झाडे नष्ट झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूनी वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये वड, करंज, तामण, पिंपळ, चीवन, आवळा, पळस, बांबू, जांभूळ, फणस, आंबा यासारखी विविध फळ व सावली देणारी वृक्षाची लागवड केली आहे. या लागवड केलेल्या वृक्षांना काटेरी कुंपण केली आहे. त्यामुळे आगामी काळात हि वृक्ष अधिक बळकट होणार आहेत. माणगाव तालुक्यात वनविभाग व पंचायत समितीने नियोजन केल्याने माणगाव तालुक्याने वृक्ष लागवडीत उच्चांक गाठला आहे.