| पाताळगंगा | वार्ताहर |
आंबा पिकाचा खरा हंगाम सुरु होतो तो नोव्हेंबर महिन्यात. या महिन्यातील थंडीमुळे आंब्याला मोहर लागण्यास सुरवात होते. ही प्रक्रिया तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आंब्याच्या झाडाला फळ लागते. पण यंदा सर्वकाही अवकाळीने हिसकावले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मोहर लागत असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण क्षमतेने मोहर लागण्यापूर्वीच तो गळाला होता. आता मोहोरामध्ये फलधारणा झाली असून,काही ठिकाणी हिरव्या वाटाण्याएवढी, तर काही ठिकाणी आवळा व सुपारी एवढ्या आकाराची कैरी झाली आहे. सध्या आंबा फळे आकाराने लहान असली तरी काही दिवसात च कैरी बाजारात दाखल होण्याची शक्यता शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. हवामान बदलामुळे मोहर आलेला गळून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गांकडून वर्तवली जाता आहे.
निसर्गाच्या या लहरीपणामुळे यंदा आंबा उशिराने बाजारपेठेत दाखल होणार आहे. याचा परिणाम दरावर होणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदा आंब्याच्या दरात वाढ होईल असा अंदाज आहे. शिवाय त्याच्या दर्जावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अवकाळीमुळे वर्षभरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.