| मणिपूर | वृत्तसंस्था |
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. येथील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बूस्खलनामधील मृताची संख्या वाढतच आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृताची संख्या 81 वर पोहचली आहे. यामध्ये लष्करातील जवानांसह सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे.
या दुर्घटनेमध्ये 30 पेक्षा जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. मणिपूर राज्याच्या इतिहासातील ही सर्वात वाईट घटना असल्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. खराब हवामान आणि वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत. परंतु, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.