पुण्याचे 80 सायकलस्वार मुरुडमध्ये दाखल
| आगरदांडा | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला व परिसर स्वच्छ करणे आमचे ध्येय असून, त्यासाठी आम्ही स्व-रुपवर्धिनी संस्थेचे सर्व मावळे मुरुडमध्ये आल्याचे अध्यक्ष निलेश धायरकर यांनी सांगितले. महाराजांचे जे जे किल्ले पडीक झालेत, त्यांचे शासनाने संवर्धन व जतन करावे, अशी प्रतिक्रिया श्री. धायकर यांनी दिली.
स्व-रूपवर्धिनी संस्था गेली 43 वर्षे पुण्याच्या वस्ती भागात सामाजिक व शैक्षणिक काम करीत आहे. संस्थेचे 80 विद्यार्थी सायकलवरुन मुरुड शहरात आगमन होताच, त्यांचे मुरुड पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मुरुड पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन समितीचे उपाध्यक्ष राहुल कासार, सुनील शेळके, प्रवीण पाटील, महेंद्र मोहिते, रूपेश जामकर, प्रमोद मसाल, अच्युत चव्हाण, प्रदीप बागडे, महेश साळुंखे, पुणे येथील विनेश नगरे, निशिकांत वाईकर, तुषार काबदुले आदींसह 80 विद्यार्थी उपस्थित होते.
प्रथम पुणे येथील स्व-रूपवर्धिनी संस्थेचे निलेश धायरकर यांचे स्वागत पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन समितीचे रूपेश जामकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केले.
(छायाचित्र : गणेश चोडणेकर)