विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे तीन दिवस उरलेले आहेत. त्यामुळे अवघा महाराष्ट्र गणेशमय होऊन गेलेला आहे. कोकणवासियांसाठी गणेशोत्सवाचा सण मोठा असल्याने परशुरामाची भूमीत सध्या आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. योगायोगाने सध्या वरुणराजानेही उघडीप दिली आहे. त्यामुळे समस्त गणेशभक्तांचा आनंद निश्चितच द्विगुणीत झालेला आहे.लाडक्या गणेशाचे स्वागत करण्यासाठी लाखो चाकरमानी गेल्या चार दिवसांपासून महामार्गावरुन कोकणातील आपापल्या गावाकडे मार्गस्थ होऊ लागलेले आहेत. त्यांचा प्रवास निश्चितच सुखकर होवो अशी मनोकामना.कारण सध्या महामार्गाची दुरवस्था ही वर्णनापलिकडची झालेली आहे. रस्ता कमी आणि खड्डेच जास्त असेच वर्णन केले तर त्यात गैर काहीच होणार नाही. एक तप हा मार्ग विविध कारणांनी रखडलेला आहे. चौपदरणीकरणाचा निर्णय झाल्यापासून आतापर्यंत चार सरकारे सत्तेवर आली. प्रत्येक सरकारने केवळ डागडुजी करण्यावरच समाधान मानत या महामार्गाचे घोंगडे कायमस्वरुपी भिजत ठेवले आहे.विद्यमान सरकारने आता 2023 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांना गणरायाने सुबुद्धी द्यावी, अशीच यानिमित्ताने प्रार्थना. मुंबई-गोवा महामार्गानंतर जाहीर झालेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आता पूर्णत्वास गेला आहे. पहिल्या टप्प्याचे आणखी दोन महिन्यात लोकार्पणही केले जाणार आहे. पण तसा वेग मुंबई-गोवा महामार्गाबाबत राज्यकर्त्यांनी दाखविला नाही ही खंत कोकणवासियांना कायमची लागून राहिलेली आहे.आज या महामार्गावरुन दरवर्षीप्रमाणे लाखो गणेशभक्त गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जात आहेत. त्यांच्यासाठी एसटीने नेहमीप्रमाणे लालपरी सज्ज ठेऊन गणेशभक्तांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचविण्याचे काम सुरु केेलेले आहे. यातून महामंडळाला देखील बाप्पाची कृपा झालेली आहे. कोरोनामुळे एसटीची अवस्था दयनीय झालेली होती.पण आता सणासुदीमुळे एसटीचे रुतलेले चाक पूर्वपदावर येताना दिसत आहे. रेल्वेच्या सर्व गाड्या तुडूंब गर्दीने भरुन जात आहेत. कोरोना संकटामुळे गणेशभक्तांना तर आधी कोरोना टेस्ट करुनच प्रवास करावा लागत होता. त्यातून यावर्षी सुटका झाल्याने सार्यांचा प्रवास निर्विघ्नपणे सुरु आहे. उत्सवामुळे गावागावातील वातावरणही आनंदीमय झालेले आहे. गणेशाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या पेणमध्ये तर कोट्यवधींची उलाढाल यानिमित्ताने होत आहे. देखण्या, आकर्षक गणेशमूर्तींना केवळ देशातच नव्हे तर परदेशातूनही मोठी मागणी असल्याने पेणचे बाप्पा यापूर्वीच विदेशात दाखल झालेले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत राहिल्याने लाखो हातांना काम मिळत आहे. सरकारनेही मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध तसेच पीओपीवरही बंदी मागे घेतल्याने गणेशमूर्तीकारांना देखील यावर्षी चांगलेच सुगीचे दिवस आलेले आहेत. अर्थात गणेशोत्सव हा समाजातील प्रत्येक घटकाला काहीना काही प्रसादरुपाने देत असतो याचे प्रत्यंतर येताना दिसत आहेत. फुललेल्या बाजारपेठांमुळे सारा माहोलच बदलून गेलेला आहे. पुढील पंधरा दिवस हे असेच उत्सवमय होऊन जाणार आहे. हा उत्सव निर्विघ्णपणे पार पाडण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. गणेशोत्सवासारखे उत्सव हे सर्व समाजांना एकत्र आणणारे सण आहेत.त्यातून आनंद मिळण्याबरोबरच आर्थिक उन्नतीपण व्हावी हा मुख्य हेतू असतो. यासाठी प्रत्येकाने सामाजिक भान ठेऊन उत्सवाचा कुठेही बेरंग होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासन यासाठी करडी नजर ठेऊन आहे. गणेशभक्तांचा येण्याजाण्याचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून महामार्गावर टोलमाफीबरोबरच अवजड वाहतूकही बंद कण्यात आलेली आहे. त्यामुळे विना अडथळा हा प्रवास सुरु झालेला आहेे. पण आपणही सर्वांनी जागरुकपणे सजग राहिलो तर उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहणार नाही. कोकणच्या भूमीला ते एक वरदान आहे. आतापर्यंत प्रत्येक संकटावर मात करीत कोकणी माणसाने गणेशोत्सव आनंदात साजरा केलेला आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरु होणारा गणेशोत्सव हा देखील तसाच अमाप उत्साहात साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाही.