नैसर्गिक आपत्तींला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज

। अलिबाग । वार्ताहर ।
आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजना तसेच इतर विकासकामांबाबत आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे व विविध शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील वीज पुरवठा, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, पूल दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, कृषी बागायतदारांना नुकसान भरपाई, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी उपयोगी पडणारी तात्पुरती निवारागृहे, धोकादायक ठिकाणे व तेथील उपाययोजना, पोलीस व स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण कक्ष, नागरिकांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधा आदी विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला.नैसर्गिक आपत्तीत सर्व यंत्रणांनी सतर्क व सुसज्ज राहावे, आपापसात योग्य तो समन्वय साधावा, जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, नागरिकांच्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.

Exit mobile version