श्रीवर्धनमधील गाव-वाड्यांतील नेटवर्क गायब

दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील नऊ गावांचा मोबाईल नेटवर्क गायब झाले आहे. वारंवार होणार्‍या नेटवर्कबाबतच्या अडचणीमुळे येथील मोबाईलधारकांना बीएसएनएल सेवा ही त्रासदायक बनली असून आता दुसरा पर्याय उरला नसल्याने ग्राहकांमधून कंपनी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील कासारकोंड, धनगरमलई, नागलोली मधलीवाडी, नागलोली, नागलोली नवीवाडी, देवखोल, बोर्ला, बोर्ला रसाळवाडी, वावेपंचतन या एकूण नऊ गावांना नेटवर्क सुविधा मिळावी यासाठी चार वर्षांपूर्वी बीएसएनएल कंपनीचे टॉवर याठिकाणी बसवण्यात आले. सुरुवातीपासूनच या यंत्रणेत सातत्याने बिघाड होत असल्याने हा दुर्गम भाग म्हणून येथील कर्मचार्‍यांबरोबर अधिकार्‍यांचे कायम दुर्लक्ष होत आहे. तात्पुरती सेवा सुरळीत झाली की पुन्हा बिघाड झालेल्या यंत्रणाकडे कायम दुर्लक्ष होतं. त्यामुळे बीएसएनएलची दूरध्वनी सेवा कायमचीच खंडित होत राहिली. अद्यापही या सरकारी कंपनीच्या सेवेवर अवलंबून असलेला ग्रामीण भाग मात्र, त्रस्त झाला आहे.

या भागातून इंटरनेट सेवेचा मोबाईलधारक प्रचंड प्रमाणात वापर करीत आहेत. येथील गावांची 1600 हुन अधिक लोकसंख्या आहे. यातील अनेकजण कामानिमित्त मुंबईस्थित असल्याने कित्येक वेळा या आडमार्गावर कोणतीच सुविधा मिळत नाही. अचानक तसा प्रसंग बेतला तर रात्रीबेरात्री कोणत्याही मदतीसाठी आजूबाजूंच्या गावांकडे संपर्क साधावा लागतो. मात्र, अशा वेळेला संपर्क होत नसल्याने कंपनीच्या सेवांना स्थानिक नागरिक वैतागल्याचे दिसत आहे.

आमच्या भागात कोणतीच नेटवर्क सुविधा नाही. त्यामुळे बीएसएनएल शिवाय आम्हा गावकर्‍यांना दुसरा पर्याय नाही. सुरळीत नेटवर्क सुविधा मिळावी अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी आहे. – जयेश जाधव, स्थानिक रहिवासी.

Exit mobile version