। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्याने टाकतंय. त्यात सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी आहे. या सगळ्या एजन्सींचा वापर राजकीय दृष्टीने केला जात असल्याचं चित्र दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल तेव्हाच्या मुंबई पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले होते. त्यांनी हे आरोप मलाही सांगितले होते. पण या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आता कुठे आहेत, याचा पत्ता लागलेला दिसत नाही. पण एक जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत बेछूट आरोप करतो, हे चित्र कधी घडलं नव्हतं. अनिल देशमुखांनी यावर सत्तेपासून बाजूला होण्याची भूमिका घेतली. दुसर्या बाजूला ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ गायब झाले हा फरक आहे.असेही त्यांनी निदर्शनास आणले.
पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो. सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो.
शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष