देशात प्रथमच जमीन संपादनाला नवा आयाम
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई 3.0 च्या उभारणीसाठी जमीन संपादन प्रक्रियेत मूलभूत बदल करत देशातील पहिल्यांदाच सहभागात्मक मॉडेल लागू केले आहे. या धोरणातून जमीनधारकांना केवळ भरपाई देण्याऐवजी त्यांना विकास प्रक्रियेचे प्रत्यक्ष भागीदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रात विकसित होणाऱ्या नव्या शहरासाठी मुंबई 3.0 साठी एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली असून, रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील सुमारे 323.44 चौ.कि.मी. क्षेत्र आणि 124 गावे या योजनेत समाविष्ट आहेत. दि. 16 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणारी ही जमीन संपादन योजना पारंपारिक जमीन संपादन पद्धतींपासून वेगळी असून, सहमती, पर्याय आणि पारदर्शकता या तत्त्वांवर आधारित आहे. या संदर्भात एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, मुंबई 3.0 घडवताना आम्ही लोककेंद्रित विकासाला प्राधान्य दिले आहे. शहरनिर्मिती ही केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरती मर्यादित नसून ती नागरिकांच्या सहभागातूनच यशस्वी होते. म्हणूनच आम्ही जमीनधारकांना विविध पर्याय दिले आहेत, जेणेकरून ते त्यांच्या गरजेनुसार निर्णय घेऊ शकतील. या प्रक्रियेचे यश नागरिकांच्या स्वेच्छेने आणि सकारात्मक सहभागावर अवलंबून असेल, असेही सांगितले.
एमएमआरडीएची ही पुढाकार जमीन संपादनाच्या पारंपरिक चौकटीला छेद देणारी ठरत असून, जमीनधारकांना निष्क्रिय घटक न मानता त्यांना विकास प्रक्रियेतील सहभागी भागीदार म्हणून स्थान देत आहे. मोठ्या प्रमाणावर शहरीकरणाच्या प्रक्रियेत विश्वास, पारदर्शकता आणि पर्यायाधारित सहभाग या तत्त्वांवर आधारित हा मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरू शकतो, असे मत व्यक्त होत आहे.
