मोदी सरकार महागाईचा भस्मासुर : श्रीरंग बरगे यांची टीका

14 ते 19 नोव्हेंबर राज्यात काँग्रेसचे जनजागरण अभियान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वाढते इंधन दर, वाढती महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे महागाईचा भस्मासुर आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि रायगड जिल्ह्याचे सह प्रभारी श्रीरंग बरगे यांनी अलिबागेत पत्रकारांशी बोलताना केली.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्तानेमहागाई विरोधात 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यभर जनजागरण अभियान राबविण्यात येण्यात आहे,त्या बाबत माहिती देण्यासाठी येथील काँग्रेसभुवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्रीरंग बरगे बोलत होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, माजी जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. जे.टी. पाटील, चंद्रकांत पाटील, पर्यावरण सेलचे अशोक मोरे, अलिबाग तालुका प्रमुख योगेश मगर, हर्षल पाटील, मिलिंद पाडगावकर, काका ठाकूर, मोनिका पाटील, नयना घरत आदी काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
प्रदेश सचिव श्रीरंग बरगे यांनी वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारवर टीका करताना, युपीए सरकारच्या काळातील पेट्रोल- डिझेल चे दर आणि सद्यस्थितीत असलेले दर यातील तफावत निदर्शनास आणून दिली. वाढत्या दर महागाईची झळ सर्वानाच बसत असल्याचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले.
महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. या मध्ये पदयात्रा, जागरण असे केंद्र शासनाच्या विरोधात कार्यक्रम होणार आहेत. म्हसळा येथे जनजागरण अभियानाचा मुख्य कार्यक्रम वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे महेंद्र घरत यांनी सांगितले.

गांधी टोपीचे दर्शन
14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात केंद्र शासनाच्या विरोधात राबविण्यात येणार्‍या जनजागृती अभियानाच्या निमित्ताने बर्‍याच कालावधी नंतर काँग्रेस कार्यकर्ते गांधी टोपीत दिसणार आहेत, ही गांधी टोपी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याची आज रंगीत तालीमच पहायला मिळाली. पत्रकार परिषदेत उपस्थितीत सर्व पदाधिकार्‍यांच्या डोक्यावर सफेद गांधी टोपी पहायला मिळाली.

Exit mobile version