मान्सून अंदमानात दाखल

महाराष्ट्रात पोषक वातावरण
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
डोळ्यांत प्राण आणून दरवर्षी शेतकरी ज्याची वाट पाहतात, तो मान्सून सोमवारी 16 मे रोजी अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. तो केरळमध्ये तो 27 मेपर्यंत पोहोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान तयार होत आहे. या राज्यांमध्ये अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे.
महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय विदर्भामध्येही ढगाळ वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

गारांच्या पावसाची शक्यता
उत्तरेकडील डोंगरी राज्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत गारांच्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पुढील दोन दिवस धुळीचे वादळ उठण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट?
मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दक्षिण-मध्य कर्नाटकवरील चक्रीय वार्‍याच्या स्थितीमुळे व अरबी समुद्रावरून येणार्‍या आर्द्रतायुक्त वार्‍यामुळे पुढील 5 दिवस तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी, केरळ व महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर उत्तर व मध्य भारतातील काही भागांत उष्ण लाटांचीही शक्यता आहे.

के. एस. होसाळीकर,भारतीय हवामान विभाग
Exit mobile version