पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा; ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील अंबा नदीच्या नवीन पुलाचे काम सुरू आहे. जॅकवेल जवळच पुलाचे काम सुरू असल्याने तेथील नदीपात्रात चिखल, माती, राडारोडा व सिमेंट मिसळून पाणी खराब झाले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून पालीकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्धपाणी योजना ही 1974 साली मंजूर झाली आहे. तिचा एकूण खर्च आता 27 कोटींवर गेला आहे. मात्र ही 27 कोटी रुपयांची शुद्ध पाणी पुरवठा योजना लालफितीती अडकली आहे.

पालीकरांना पाण्यासाठी मागील कित्येक वर्षे केवळ आश्वासनेच मिळत आली आहेत. कित्येक सरकारे बदलली मात्र पाण्याची समस्या मार्गी लागलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार यांच्याविषयी असंतोषची धारणा झाली आहे.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. इतरही गावातील लोक अंबा नदीचे पाणी वापरतात. सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळू उपश्यामुळे येथील नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याशिवाय नदीच्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. सुधागड तालुक्यात पाली, राबगाव, आंबोले, रासळ, कानसळ, हेदवली, जांभूळपाडा या गावाजवळ अंबा नदीच्या काठावर अनेक कंपन्या, फार्महाऊस, निवासी संकुल उभे राहिले आहेत. कंपन्यातील दुषित रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदुषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदीवर महिला धुणीभांडी करतात. याबरोबरच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखील पाणी खराब होते. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येत असून चवही खराब झाली आहे.

पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचे जनजीवन धोक्यात आले आहे. दुषित पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने जनावरांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

पालीकर व भाविकांना दूषित पाणी पुरवठा
पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.

पाली नगरपंचायत नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. पाली अंबा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम चालू असल्याने नदीचे पाणी हे गढूळ झाले आहे. परिणामी शहरात गढूळ पाणी पुरवठा होत आहे. तरी पाली नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी पाणी गाळून व उकळून वापरावे. पुलाचे काम करत असताना नदीचे पाणी खराब होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना एमएसआरडीसी व ठेकेदाराला देणार आहोत.

सुधीर भालेराव, पाणी पुरवठा सभापती, पाली नगरपंचायत
Exit mobile version