पालीकरांना चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. मागील अनेक दिवसांपासून अवकाळी मुसळधार पावसामुळे अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ व दूषित झाले आहे. त्यामुळे पाली नगरपंचायत हद्दीमध्ये गढूळ व चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, भाविक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सलग चार-पाच दिवस पाली नगरपंचायतीचे पाणी पूर्ण गढूळ येत आहे. याबाबत कोणीच काही उपाययोजना केलेली नाही. सुरेखा जाधव यांनी सांगितले की, पाली नगरपंचायतीचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नगरपंचायतीकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात जीवजंतू येतात. नागरिकांना अशा दूषित व गढूळ पाण्याचा वापर घरात स्वयंपाक करण्यासाठी पिण्यासाठी आंघोळीसाठी करावा लागतो. पालीतील नागरिकांना नियमित दूषित पाण्याचा पुरवठा होतो. मागील महिन्यात तर पालीत काही ठिकाणी काळ्या पाण्याचा पुरवठा होत होता, असेही त्यांनी सांतिगतले.
अंबा नदीला प्रदूषणाचा विळखा
अंबा नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळू उपसा यामुळे येथील नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आली आहे. कंपन्यांतील दूषित रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाणदेखील साठते. नदीवर महिला धुणीभांडी करतात. याबरोबरच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्यानेदेखील पाणी खराब होते. परिणामी, ते अधिक दूषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरूपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. पावसाळ्यात तर नियमित गढूळ पाण्याचा पुरवठा होतो.
शुद्धीकरण न करता पाणीपुरवठा
पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. शिवाय 27 कोटींची शुद्ध पाणी पुरवठा योजना लालफितीत अडकली आहे.
मागील अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे. पाली शुद्ध पाणी योजना लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आवश्यक पाठपुरावादेखील करत आहोत. मात्र, यासाठी सर्वांचे सहकार्य व सोबत अपेक्षित आहे.
प्रणाली शेळके,
नगराध्यक्षा,
पाली
सध्या नळाला अतिशय दूषित, गढूळ पाणी येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
श्रेयश भालेराव,
सामाजिक कार्यकर्ते, झाप