स्वराज्य स्पोर्टस्, महात्मा गांधी स्पोर्ट्स अंतिम विजेते
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई उपनगर कबड्डी असो. ने आयोजित केलेल्या 43व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत स्वराज्य स्पोर्ट्स, महात्मा गांधी स्पोर्ट्स कुमारी गटात अनुक्रमे पूर्व व पश्श्चिम विभागात विजेतेपद पटकाविले. गजानन मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ले येथील प्ले-ग्राउंडवर हे सामने संपन्न झाले.
पूर्व विभागातील कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात कांजूरच्या स्वराज्य स्पोर्ट्स ने कुर्ल्याच्या एस. आय. इ. एस. चा 47-22 असा पराभव करीत विजेते पदाला गवसणी घातली. आंतर राष्ट्रीय खेळाडू सेरेना म्हसकरचा धुव्वादार खेळ तिला सानिया इंगळे, मधुरा सावंत यांची मिळालेली चढाई पकडीची साथ यामुळे स्वराज्यने विश्रांतीला 24-04 अशी भक्कम आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर मात्र एस. आय. इ. एस. च्या आस्था सिंग, तनुश्री शिंदे यांनी आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली. पण संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्या कमी पडल्या.
पश्श्चिम विभागातील कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात बांद्राच्या महात्मा गांधी स्पोर्ट्सने मालाडच्या आकाश मंडळाला 39-17 असे नमवीत जेतेपदाचा चषक उंचावला. पूर्वार्धात 19-07 अशी आघाडी घेणाऱ्या महात्माने उत्तरार्धात देखील आपल्या खेळाची गती कायम राखत आपला विजय सोपा केला. पूजा चिंदरकर, प्रतिक्षा सर्वसाने यांच्या चढाई पकडीच्या सर्वांगसूंदर खेळाला याचे श्रेय जाते. आकाशच्या तन्वी बारगुडे, शलाका मर्ढेकर बऱ्या खेळल्या. या अगोदर झालेल्या कुमारी गटाच्या पूर्व विभागात स्वराज्य स्पोर्ट्स ने स्नेह विकासचा 52-17 असा, तर एस. आय. इ. एस. ने शिवकन्या मंडळाचा 30-06 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. पश्श्चिम विभागातील कुमारी गटाच्या उपांत्या फेरीत महात्मा गांधीने माऊली प्रतिष्ठानला 35-08 असे, तर आकाश स्पोर्ट्स ने निवारा हिड इंडियला 32-12 असे नमवीत अंतिम फेरीत धडक दिली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ स्पर्धा आयोजक मिलिंद शिंदे, समाजसेविका मनीषा शिंदे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, यांच्या उपस्थितीत पार पडला.







