मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |
11 जुलै रोजी मुरूड तालुक्यातील काशीद गावाजवळील पूल मुसळधार पावसामुळे कोसळल्याने 12 जुलै पासून मुरूड ते अलिबाग बंद पडला आहे.नव्याने उभारलेल्या या काशीद पुलाचे उदघाटन 4 दिवसा पूर्वी आमदार महेंद्र दळवी, यांचे हस्ते झाले असले तरी या मार्गे अलिबाग ते मुरूड एस टी सेवा विहूर, चिकणी गावानजीक मोरी आणि रस्ता खचल्यानें अवजड वाहनांसाठी बंदच आहे अशी माहिती मुरूड बस आगार प्रमुख सनील वाकचौरे यांनी गुरुवारी बोलताना दिली.
या मार्गावर अतिवृष्टी मुळे चिकणी, विहूर गावानजीक मुख्य रस्ता खचल्यानें छोट्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे; मात्र धोका वाटत असल्याने एस टी बस सेवा सुरू करू नये असे पत्र तहसील प्रशासनाने बस आगराला दिले आहे.त्यामुळे मुरूड आगरातून भालगाव मार्गे रोहा मार्गे 50 किमी वळसा घेऊन अलिबाग येथें जावे लागत आहे. हा सर्व प्रकार म्हणजे एस टी आणि प्रवाशांसाठी नुकसान कारक आहे. त्यामुळे एकूण 43 शेड्युलस पैकी फक्त 12 शेड्युलस ( बसेस) भालगाव मार्गे मुंबईकडे सोडल्या जात आहेत.या मार्गावर टप्पा वाहतूक कमी प्रमाणात असल्याने भारमान फारसे मिळत नाही अशी माहिती व्यस्थापक सनील वाकचौरे यांनी दिली. हा मार्ग कधी सुरू होणार याबाबत निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. अन्यथा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील प्रवाशी वाहतुकीचे नियोजन करता आले असते. आरक्षणासाठी प्रवाशांचे दूरध्वनी सातत्याने येत असून याबाबत नियोजन करणेअशा परिस्थितीत अवघड झाले आहे.प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आमचे सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याचे सनील वाकचौरे यांनी नमूद केले.
एरव्ही मुरूड बस आगराला 43 फेऱ्यांमधून दररोज 3लाख 50 हजार इतके उत्पन्न मिळते. आता पहाटे 5 वाजल्यापासून दुपारपर्यंत मुंबई, धुळे, ठाणे, बोरीवली, भांडुप,कल्याण अशा विविध मार्गावर भालगाव रोहा मार्गे पुढे12 फेऱ्या होत असून जेमतेम 1लाख 20 हजारा पर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे रोज सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान मुरूड आगराला सोसावे लागत आहे, अशी माहिती वाकचौरे यांनी दिली. गणेशोत्सव नजीक असल्याने बंद असलेल्या मार्गाची दुरुस्ती आधिक जलद झाल्यास एस टी सेवा आधिक परिणामकारकरित्या चाकरमानी आणि गणेश भक्तांना उपलब्ध होईल, अन्यथा परिस्थिती निश्चित अवघड बनेल असे स्पष्टपणे दिसून येते. फेऱ्या फक्त 12 असल्याने अन्य बसेस सध्या आगरातच उभ्या आहेत.येथुन मुंबईकडे जाण्यासाठी अलिबाग व्यतिरिक्त कोणताही किफायतशीर आणि जवळचा मार्ग नाही.