मुरूड खोराबंदर तळीरामांचा अड्डाच

दारुच्या बाटल्यांसह फोडलेल्या काचांचा खच

| मुरूड | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येत आहेत. हा किल्ला पाहण्यासाठी मुरुड शहरापासून फक्त 1 किमी अंतरावर खोरा बंदर आहे. पण या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन अनेक तळीरामांनी अड्डा बनविला आहे. या ठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खच नेहमी दिसून येत आहे. बाटल्यांचा काचा फोडलेल्या सापडत आहेत. त्यामुळे पर्यटक व स्थानिकांना अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंदरात दिवसभर पर्यटकांची रेलचेल असते. त्यानंतर सायंकाळी वाहतूक बंद केली जाते. एकदा अंधार पडला की या ठिकाणी तळीरामांची पावले दारुच्या बाटल्या, चकणा, पाण्याच्या बाटल्या, सोडा बॉटल व शितपेय घेऊन येऊ लागतात. या ठिकाणी कोणतेही सुरक्षा रक्षक नसल्याने या तळीरामांचे चांगलेच फावते आहे. येतात तर येतात, दारू पिऊन झाल्यावर काचेच्या बाटल्या फोडून तिथेच टाकून जातात. त्यामुळे येणार्‍या पर्यटकांना व त्यांच्या लाहनांना काचा लागून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याठिकाणी स्वच्छ वातावरण असल्याने पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक घेणार्‍यांनाही या कारणांमुळे अपघात होऊ शकतो. या ठिकाणी स्थानिक मच्छिमार सुद्धा रात्री बेरात्री येत असतात. त्यांना सुद्धा या काचा लागून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी बंदर खात्याने या बंदरात येणार्‍या तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक व पर्यटकांन मधून होत आहे.

Exit mobile version