माझी अटक महागात पडेलः मनोज जरांगे

| बीड | वृत्तसंस्था |

मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असं सरकारने म्हटले होते. पण त्यांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यताही असू शकते. पण मला अटक करणं सरकारला तेवढं सोपं जाणार नाही. मला अटक करायची असेल तर करू द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे, हे सरकारला कळेल, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षणावरून काही दिवसांपूर्वी बीडमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. संतप्त आंदोलकांनी काही आमदारांच्या घरासह मालमत्ता आगीच्या हवाली केली होती. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर तपास सुरु ठेवला आहे. पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. तर अनेक आंदोलक पोलिसांच्या रडारवर आहेत. शिवाय बीड येथील हिंसाचार प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे, की आंदोलकांची अटक थांबवा. बीडमध्ये जे घडलं ते सत्य आहे. त्याचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही. पण तुम्ही निष्पाप लोकांना तुरुंगात टाकलं आहे. तीन-चार हजार लोकांच्या याद्या केल्या आहेत. काही पोलिसांची जात उफाळून आली आहे. निस्पृह आणि निरपेक्ष भावनेने सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या पोलिसांनी जात-पात मानली नाही तरच शांतता प्रस्थापित राहील. लोकांनी पोलिसांवर रोष व्यक्त करू नये . पोलीस हा आपला मित्र आहे. पोलीस आपल्याला आधार देणारा आहे. जातीय द्वेष करणार नाही, अशी भावना मराठ्यांनी ठेवावी असे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.

Exit mobile version