वणवामुक्त गाव संकल्पना कागदावरच
। गोवे- कोलाड। वार्ताहर ।
नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेल्या रोहा तालुक्यात या वर्षीही वणव्याचे ग्रहण कायम आहे. खांब येथील तसेच वैजनाथ माथ्यावरील डोंगराला रविवारी (दि.07) रात्री लागलेल्या वणव्यात डोंगरचे डोंगर, दर्याखोर्यांसह रानमेवा, आंबा, काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थळी पडून होरपळत आहेत. शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ‘वणवामुक्त गाव’ ही संकल्पना केवळ कागदावरच शिल्लक राहिल्याने येथील मोठी ‘निसर्ग संपदा’ पुरती काळवंडत चालली असल्याचे सांगण्यात येत आहे. वन विभागासहीत प्रशासनाने वणवे लावणार्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत नियोजन केले असतानाही संबंधित प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे आता त्यावर सामूहिकपणे नियंत्रण आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या चारही बाजूला असलेल्या डोंगराळ परिसरात वणवे लावण्याचे प्रकार घडत आहेत. या डोंगराळ परिसरात असलेल्या गवतावर वणवे लावून डोंगर उजाड केले जात आहेत. वणव्यामुळे परिसरातील अनेक झाडे तसेच आंबा, काजू, कोकम, करवंदांच्या जाळ्या, जांभूळ अशी फळझाडे जळून खाक होत आहेत. काही शेतकर्यांनी फळ बागायतीसह वृक्ष लागवड केली आहे. वणव्यामुळे त्याचा फटका या बागायतींना बसत आहे. यामुळे बागायतदार शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. बागायतीमधील आंबा, काजू, कोकम आदी फळझाडे होरपळून जात आहेत. जंगलांतील अनेक दुर्मिळ झाडे, पक्षी संकटात आले आहेत. शासनाने वन विभागाच्या माध्यमातून ‘वणवामुक्त गाव’ चे नियोजन केले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणचे सरपंच यांच्यावर वणवा न लागण्याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे; मात्र शासन व निसर्ग संस्थांचे हे नियोजन वणवा लावणार्यांमुळे अपयशी ठरले आहे. गुरांना पावसाळी हंगामात चांगला चारा मिळावा, याकरिता वणवे लावले जात असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच वणव्यामुळे कोकणची निसर्गसंपदा व फळ बागायतींची राख होत आहे. त्यामुळे वणवा लावणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे
जंगलांना वणवे लागण्याच्या घटना पर्यावरण प्रेमींसह सार्यांनाच चटका लावून जात आहे .त्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे .वाढत्या वणव्याच्या घटनांवर वनविभागाकडून उपाययोजना करणे गरजेचे आहे. वणवा समस्येवर अधिक प्रभावी लोक चळवळ उभी करावी लागणार आहे.
अजय भोसले
पर्यावरण प्रेमी