नवी मुंबई पालिकेचे लूट अभियान

सजग नागरिक मंचाचा गंभीर आरोप

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

प्रशासकीय राजवट म्हणजे शासनमान्य तिजोरी लुटीचा परवाना, अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालू असल्याचे वारंवार होणाऱ्या अनियंत्रित, अवाजवी कामांमुळे दिसून आलेले आहे. त्याचीच पुनरावृत्ती नालेसफाई कामाच्या बाबतीत देखील होताना दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेतील नालेसफाई ही प्रशासनासाठी तिजोरी लुटण्याची सुवर्णसंधी बनल्याचा गंभीर आरोप नवी मुंबईतील सजग नागरिक मंचाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर विभागातील नालेसफाई कामात तब्बल 59 लाख 54 हजार 728 इतका खर्च दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. बेलापूर सेक्टर 30/31 मधील नाल्यात 180 ट्रक गाळ काढल्याचा दावा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात मात्र 8 ते 10 मजूर 3-4 दिवस फावड्याने हा गाळ काढत होते. त्यांनी तेथील झुडपे काढण्याचे काम केले असल्याचे देखील निदर्शनास आले. यावरून याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ नाल्यात जमा झालेलाच नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती अन्य 4 नाल्यांच्या ठिकाणी दिसून आलेली आहे. दरम्यान, सजग नागरिक मंचाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता कंत्राटात नमूद केलेले गाळाचे प्रमाण आणि प्रत्यक्षात नाल्यातील गाळ यात मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून आली. त्यामुळेच प्रशासनाने कुहेतूने तिजोरी लुटण्याच्याच हेतूने नालेसफाईचे कंत्राट दिलेले आहे, असे सजग नागरिक मंचाकडून बोलले जात आहे. तसेच, मुंबईतील मिठी नदी भ्रष्टाचारासारखीच पुनरावृत्ती नवी मुंबईत होत आहे. त्यामुळे नालेसफाई नव्हे, ही थेट तिजोरी सफाई आहे, असा आरोप मंचाकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे नवी मुंबईतील सर्व नालेसफाई कामांची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तपास, गाळ काढणी संदर्भातील ट्रक नंबर, गाळ टाकण्याची ठिकाणे, वाहतुकीच्या परवानग्या आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करणे, दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून वसुलीची कारवाई करणे, तंत्रज्ञानाचा वापर करून कामे व खर्चाची पडताळणी करणे, पुढील काळात नालेसफाईची टेंडर प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारीमध्येच पूर्ण करून वर्क ऑर्डर मार्चमध्ये देणे बंधनकारक करणे, पालिकेच्या संकेतस्थळावर नालेसफाई कामांची संपूर्ण माहिती अपलोड करणे आणि मागील 3 वर्षांच्या नालेसफाई खर्चाबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणे, अशा मागण्या सजग नागरिक मंचाने निवेदनाच्या माध्यमातून पालिका आयुक्तांकडे केलेल्या आहेत. निवेदनाची प्रत आयुक्तांसोबतच लोकायुक्त, मुख्यमंत्री सचिवालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महालेखापरीक्षक व नगरविकास विभागाला देखील पाठवण्यात आल्याचे मंचाकडून सांगण्यात आले आहे.

आरटीआयमधून उघड झालेली आकडेवारी
एकूण गाळ काढणी: 6043 घ.मी. (सुमारे 7500ते 8000 टन)
वाहतूक: अंदाजे 1,223 ट्रक
एकूण 5 नालेसफाईचा खर्च: 59 लाख 54 हजार 728 रुपये
कंत्राटदार: नेरूळ व वाशी येथील वेगवेगळे कंत्राटदार
कार्यादेश: मे महिन्यात टेंडर, ऑगस्टमध्ये वर्क ऑर्डर

मी सेक्टर 30/31 चा रहिवाशी असून या ठिकाणच्या नाल्यात मुळात एवढा गाळाच नव्हता. 26 मेच्या पावसात येथील नाल्यातून खळखळ पाणी वाहत होते. त्यानंतर नालेसफाईचे काम झाले. फारफार तर एखाद दुसरा ट्रॅक गाळ काढला असेल. या परिसरात प्रत्येक इमारतीत सीसीटीव्ही असून प्रत्यक्षात किती गाळ काढला, याची पडताळणी होऊ शकते. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेने गटारे व नालेसफाईच्या मागील 3 वर्षांच्या खर्चावरील श्वेत पत्रिका काढावी.

भिमराव जामखंडीकर,
सदस्य,

सजग नागरिक मंच

Exit mobile version