जितेंद्र आव्हाडांना अटक;सत्ताधार्‍यांकडून बळाचा गैरवापर

। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. या प्रकारानंतर आव्हाडांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. घटनेच्या तीन दिवसांनंतर ठाणे पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणे, जमावबंदी नियम तोडणे, प्रेक्षकांना मारहाण करणे, अशा विविध कारणांवरून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. याच प्रकरणी आज जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

फेसबुक पोस्ट व्हायरल
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

Exit mobile version