तालुक्यात येणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्याची ग्रामपंचायत असलेल्या पोलादपूर शहरासाठी सात वर्षांपूर्वी नगरपंचायत अस्तित्वात येऊनही नगरपंचायतीच्या विकासकामांमध्ये ‘राईट टू पी’ प्रश्नावर सपशेल दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागातून बाजारहाट, बँका व कार्यालयीन कामकाजानिमित्त शहरात येणार्या स्त्रिया व पुरूषांचे आरोग्य या गैरसुविधेमुळे धोक्यात आले आहे.
पोलादपूर शहरात लता कळंबे या तालुक्यातील माहेरवाशिणीने चार वर्षांपूर्वी महामार्गावरील आरोग्यविषयक गैरसुविधेमुळे महिलांच्या कुचंबणेविरोधात ‘राईट टू पी’ प्रश्नावर तब्बल तीन दिवस उपोषण केले. यानंतर पेट्रोलपंप आणि महामार्गालगतच्या हॉटेल्स व एस.टी. स्थानकामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह याप्रश्नी सुसज्ज ठेवण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग तसेच राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला. मात्र, यानंतरही पोलादपूर तालुक्याचे शहर असलेल्या पोलादपूर नगरपंचायतीने याप्रश्नी दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले असून, या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी जाहीरनाम्यामध्ये या विषयाचा उल्लेख करणार्या राजकीय पक्षाला अत्यल्प यश मिळाल्याने आता महिला व पुरूषांसाठी पोलादपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वच्छतागृह अथवा मुतारीसदृश्य बांधकामे होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलादपूर शहरामध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागातून अनेक महिला व पुरूष, तरूण-तरूणी शिक्षण, बँकेतील कामे, बाजारहाट, दुध व भाजीपाला, शासकीय कार्यालयीन कामकाज तसेच छोटया मोठया नोकरीधंद्यांसाठी येत असून, या सर्वांनाच दिवसभरामध्ये स्वच्छतागृहे तसेच मुतारीची गैरसोय जाणवू लागत आहे. पूर्वी तलाठी सजेच्या मागील भागात एक जुनी पडकी इमारत याकामी वापरात येत असे. मात्र, आता या इमारतीची जीर्णावस्था पाहता इमारतीचा जीर्णोध्दार करण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळयामध्ये या प्रश्नाची तीव्रता अधिक असल्याने पोलादपूर नगरपंचायतीने तातडीने महाड नगरपालिकेप्रमाणे मोबाईल स्वच्छतागृहे आणण्याची गरज असून, पोलादपूर नगरपंचायतीचे सत्ताधारी तसेच प्रशासन याकामी तातडीने लक्ष देतील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
13 मार्च रोजी भूमीपूजन झालेल्या कामांची यादी तब्बल 11 कोटींहून अधिक किमतीची असून, शहरातील अनेक उपयुक्त आणि सुशोभिकरण तसेच उद्यानाच्या कामांमध्ये या ‘राईट टू पी’ प्रश्नावर महिला आणि पुरूषांसाठीच्या मुतारीसाठी बांधकाम होऊ शकले नसल्याने शहरातील विशेषत आजूबाजूच्या गावांतून शहरात आलेल्या स्त्री-पुरूषांमध्ये काहीशी नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.