नवीन पूल वाहतुकीस धोकादायक

लोखंडी शिगा बाहेर आल्याने अपघातांना आमंत्रण

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. येथे वाढती कारखानदारी आणि लोकसंख्या पाहता रहदारीसाठी पाताळगंगा नदीवर नव्याने तीन वर्षांपूर्वी पूल उभारला आहे. यातच जुन्या पुलावरील रहदारी बंद आहे. परंतु, नवीन पुलावरील लोखंडी शिगा बाहेर पडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलाची अवस्था पाहता वाहनचालक व नागरिकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे.

औद्योगिक क्षेत्राकडे येणार्‍या-जाणार्‍या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, दुचाकी व तीनचाकीस्वार यांची रेलचेल या पुलावरून चालू असते. पुलाच्या मधोमधच लोखंडी शिगा बाहेर आल्याने हा खड्डा चुकविताना दुचाकीस्वारांची त्रेधा उडत आहे. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, एमआयडीसी प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने एखादा मोठा अपघात झाल्यास एमआयडीसी अधिकारर्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. शिवाय, पाताळगंगा नदीवरील जुन्या पुलाचे बांधकाम लवकर सुरू न केल्यास पत्रकार आंदोलन छेडतील, असा इशारा पत्रकार राकेश खराडे यांनी दिला आहे.

Exit mobile version