बीसीसीआयकडून 18 आठवड्यांचे नियोजन
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे पुन्हा एकदा संघाबाहेर आहे. दरम्यान, बीसीसीआयने हार्दिकच्या फिटनेससाठी विशेष योजना बनवली आहे. हार्दिक स्वतःला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठी 18 आठवडे कठोर परिश्रम करणार आहे. यानंतर तो मार्च महिन्यात पुनरागमन करू शकतो. पुढील वर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक हा महत्त्वाचा खेळाडू असेल. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर देशासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिकने बहुतेक प्रसंगी संघाची कमान सांभाळली आहे. अशा परिस्थितीत पुढील विश्वचषकात हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार होऊ शकतो. या कारणास्तव बीसीसीआय त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेत आहे आणि त्याच्या पुनरागमनाची घाई करताना दिसत नाही.
बीसीसीआयने हार्दिकच्या फिटनेससाठी 18 आठवड्यांचा प्लॅन बनवला आहे. या काळात हार्दिकला एनसीएमध्ये राहून त्याच्या फिटनेसवर काम करावे लागणार आहे. हार्दिकच्या आधी, बीसीसीआयने जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंसाठी अशीच योजना बनवली होती आणि हे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये होते. आता अशीच योजना हार्दिकसाठीही तयार करण्यात आली आहे.







