आगीत नऊ गुरांचा जळून मृत्यू, गोठाही खाक

। महाड । प्रतिनिधी ।

महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावी मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत नऊ गुरांचा मृत्यू झाला. ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने गावातील दोन शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देशमुख कांबळे या गावातील गोठ्याला मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याचे ग्रामस्थांच्या उशिराने निदर्शनास आले. तोपर्यंत गोठा जळून खाक झाला होता. गोठ्यामध्ये देशमुख कांबळे येथील शेतकरी प्रभाकर देशमुख व किशोर देशमुख यांची गुरे बांधलेली होती. आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र यामध्ये नऊ गुरांचा मृत्यू झाला. संपूर्ण गोठा आगीत जळून खाक झाला. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे. गुरांचा होरपळून मृत्यू होत असल्याचे पाहिल्याने मालक व त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आल्याचे तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले. आगीचे निश्‍चित कारण समजू शकले नसले तरी शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Exit mobile version