अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने पालकांकडून संताप
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाथरज येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून मारहाण करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ आदिवासी संघटना यांना पाठविल्यावर या घटनेचे गांभीर्य लक्षात आले. मात्र, विद्यार्थ्यांना क्षुल्लक कारणासाठी मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापक अजित बनसोडे यांच्यावर आदिवासी विकास विभागाने कोणतेही कारवाई केलेली नाही. मात्र, त्यांना कारवाईपासून वाचविण्यासाठी युवासेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि कर्जत तालुका आदिवासी संघटना सरसावली असल्याने मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय पातळीवर अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. कर्जत तालुक्याचा अर्धा भाग हा आदिवासीबहुल असल्याने पाच शासकीय आश्रमशाळा तालुक्यात असून, साधारण दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यातील पाथरज येथे असलेल्या शासकीय आदिवासी माध्यामिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहेत. स्वच्छतागृहात असलेला अग्निशमन पंप तोडल्याचे कारण पुढे करुन शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित बनसोडे यांनी कोणतीही खातरजमा न करता 30 विद्यार्थ्यांना मारले.
पाथरज आश्रमशाळेतील विद्यार्थी स्वच्छतागृहात असलेले अग्निशमन पंप तोडल्याचा माहिती प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांच्या लक्षात आले. त्या ठिकाणी आणि शाळेतील प्रत्येक वर्गात तसेच किचन घर, कार्यालय आणि सर्व ठिकाणी शासनाच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्या कॅमेऱ्यात बघून प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांनी खातरजमा न करता बारावीमधील तब्बल 30 विद्यार्थ्यांना छडीने मारले. त्या छडीचे चट्टे विद्यार्थ्यांच्या अंगाखांद्यावर दिसून आल्यावर पालक वर्ग संतप्त झाला आहे.पालकांच्या तक्रारीनंतर आदिवासी सेवा संघटना आक्रमक झाली असून, आदिवासी कार्यकर्ते आश्रमशाळेत पोहोचले आणि त्यांनी जाब विचारला. प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे हे पालकांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
आदिवासी कार्यकर्ते जैतू यांनी या प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मारहाणप्रकरणी तक्रारी केल्या असून, त्यांनी पाथरज शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित बनसोडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
त्यामुळे प्रकल्प अधिकारी कार्यालयाने प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांच्याकडून प्रकारांचा खुलासा मागितला. मात्र त्यावर आदिवासी विकास विभागाचे समाधान झाले आहे काय? की प्रभारी मुख्याध्यापक यांच्यावर प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून कारवाई होणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यानंतर प्रकरण आदिवासी विकास विभागाच्या कक्षेत असताना कर्जत तालुक्याची आदिवासी समाज संघटना आक्रमक होण्याऐवजी मुख्याध्यापकांची पाठराखण करताना दिसत आहे. मारहाण झालेले बहुसंख्य विद्यार्थी हे आदिवासी समाजाचे आहेत, परंतु बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत असून, आदिवासी विद्यार्थ्याला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न आदिवासी संघटना करताना दिसत आहे.
त्यात शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद थोरवे यांनी देखील या आश्रमशाळेत भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेथे प्रसाद थोरवे यांनी मुख्याध्यापकांचे म्हणणे ऐकून घेतले; परंतु मुख्याध्यापक यांचा मार खाणाऱ्या 30 विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवश्यक वाटले नाही. त्यामुळे प्रभारी मुख्याध्यापक बनसोडे यांना राजकीय अभय दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या मारहाणप्रकरणी मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष जैतू पारधी आक्रमक आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असे बोलले जात आहे.





