| माणगाव | प्रतिनिधी |
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व हिरवळ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व स्वच्छता अभियान या विषयाला अनुसरून महाविद्यालयात ममता मेहता, शृंखला संस्थेच्या संस्थापक यांचे कचरा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस या विषयी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य सुदेश कदम यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय विकासातील भूमिका व महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रमुख व्याख्याता ममता मेहता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या दैनंदिन जीवनात योग्य ती काळजी घेऊन शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे किती आवश्यक आहे ते पटवून दिले. कचरा व्यवस्थापन, शून्य कचरा संकल्पना म्हणजे काय हे प्रात्यक्षिकासह समजावून दिले.त्याच बरोबर घरगुती कचर्याचे व्यवस्थापन कसे करावे, व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. तसेच कंपोस्ट खत, बायो एन्झायम निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले.
शृंखला संस्थेच्या सदस्या अपूर्वा देसाई यांनी सर्व प्रकारचे वेस्ट स्वच्छ व कोरडे कासे साठवावे आणि ते कशा पद्धतीने कॉम्पॅक्ट पॅकिंग करून रीसायकलिंग ला द्यावे हे समजावून दिले. जास्त करून पातळ प्लास्टिक जे अती घातक आहे ते निसर्गात न जाऊ देता, स्वच्छ, कोरडे साठवून, कॉम्पॅक्ट पॅकिंग फक्त रीसायकलींगलाच देण्याचे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक , इतर विद्यार्थी व शिक्षकांनी पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेची शपथ घेऊन महाविद्यालयीन परिसरात स्वच्छता अभियान राबविले.हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर भाई धारिया, संचालिका सोनाली धारिया व हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट च्या प्रमुख सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाला शुभेच्छा देऊन त्यांना भविष्यात अशा विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले.







