कार्यालय पाण्यात, नागरिक संकटात

जुन्या पंचायत समितीची इमारत बनली धोकादायक; कर्मचारी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता कार्यालयासह तालुका सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यालय सध्या अक्षरशः पाण्याच्या विळख्यात सापडले आहे. जुन्या पंचायत समितीच्या आवारातील या इमारतीभोवती पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांना चिखल-पाण्यातून वाट काढत कार्यालयात जावे लागत आहे. वर्षानुवर्षे ही समस्या कायम असूनही संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाचे त्याकडे गांभीर्याने लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

जुन्या पंचायत समितीची ही इमारत आधीच जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. त्यातच आवारात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्याने पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते. अनेक दिवस पाणी साचून राहिल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचे कार्यालयच अशा अस्वच्छ आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या वातावरणात सुरू असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकालाही पाण्याने वेढले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही या स्मारक परिसरात पाणी साचलेले असताना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची अशी अवस्था असणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या परिसरातील इतर शासकीय इमारतींची अवस्थाही चिंताजनक आहे. सर्व शिक्षा अभियानाची इमारत गळकी आणि धोकादायक झाली असून, वापराविना पडून असलेल्या इमारतींची देखभाल होत नसल्याने त्या हळूहळू भूतबंगल्याचे स्वरूप धारण करीत आहेत. शासनाच्या निधीतून उभारलेल्या या इमारतींचा योग्य वापर न झाल्याने लाखो-कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक मालमत्ता अक्षरशः वाया जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कार्यालय परिसरात अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने, वाढलेली झाडे-झुडपे आणि अस्वच्छतेमुळे संपूर्ण परिसराचा बकालपणा वाढला आहे. उघड्यावरच मुतारीचा वापर होत असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे. शासकीय कार्यालयांच्या परिसराची अशी अवस्था असताना स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम नेमके कोणासाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एका बाजूला नवीन आणि प्रशस्त शासकीय इमारती उभारल्या जात असताना दुसऱ्या बाजूला जुन्या इमारतींची देखभाल न झाल्याने त्या पडझडीच्या अवस्थेत जात आहेत. त्यामुळे शासनाचा मोठा निधी खर्च करून उभारलेल्या मालमत्तेचा प्रभावी वापर होत नसल्याचे चित्र आहे.

नियोजनाचा अभाव आणि संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कार्यालय आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यालय नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ही कार्यालये तातडीने सुरक्षित, सुसज्ज आणि नवीन इमारतीत स्थलांतरित करावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच जुन्या पंचायत समिती परिसरातील पाण्याचा कायमस्वरूपी निचरा, स्वच्छता, धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, अनधिकृत वाहनांवर कारवाई आणि परिसरातील झाडे-झुडपे हटवून स्वच्छता करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. कार्यालयेच जर पाण्यात आणि अस्वच्छतेच्या विळख्यात असतील, तर नागरिकांना स्वच्छता व आरोग्याचा संदेश कोण देणार? असा संतप्त सवाल माणगावकरांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने आता तरी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version