। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुबंई-गोवा महामार्गालागत गेली अनेक वर्षे कोलाड, खांब, नागोठणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगारांचे साठे व गोदामे आहेत. रात्रीच्या सुमारास या गोदामात सर्रास जाळपोळ केली जात असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. परिणामी याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ पाहणी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या परिसरात रात्रीच्यावेळी जाळण्यात येणार्या भंगारामुळे नागरिक हैराण झाले असून त्या गोदामांना ग्रामपंचायतीमधून परवानगी आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. मागील दोन-तीन वर्षपूर्वी या परिसरातील एका भंगार गोदामाला अचानक आग लागली होती. यावेळी रोहा, महाड, खोपोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. तेव्हा ती आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल चार ते पाच तासाहून अधिक वेळ लागला होता. हे उदाहरण समोर असून देखील या भंगार व्यवसायाचे जाळे येथे वाढताना दिसत आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.
रात्रीच्या सुमारास भंगारसाठ्याजवळ लावण्यात येणार्या आगीमुळे मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे भंगारसाठा गोदामात होत असलेली जाळपोळ प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात यावे. जेणेकरुन पर्यावरणाची हानी होणार नाही.
दिनकर सानप, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणप्रेमी