जिल्ह्यात ‌‘108′ सुसाट; अकरा वर्षांत दीड लाख रुग्णांनी घेतला लाभ

| अलिबाग | प्रमोद जाधव |

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जलद वैद्यकीय मदत देण्यासाठी 108 रुग्णवाहिका प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आपत्तीच्या काळात फोन केल्यानंतर काही मिनिटांत मदतीसाठी पोहोचणारी ही रुग्णवाहिका दररोज 200 किलोमीटरचा प्रवास करत असते. 2014 पासून या रुग्णवाहिकेचा सुरु झालेला प्रवास सुसाट सुरु आहे. दरम्यान, अकरा वर्षांमध्ये या रुग्णवाहिकेचा जिल्ह्यातील 1 लाख 50 हजार 126 रुग्णांनी लाभ घेतला आहे. रुग्णांना आपत्कालीन सेवा मिळत असल्याने आधार मिळाला आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरत असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच 55 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 288 उपकेंद्र कार्यरत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सर्वसामान्यांना चांगली मिळावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रयत्न राहिला आहे. मात्र, रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी कायमच आहेत. त्यामुळे अनेकवेळा रुग्णांना मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागते. त्याचा आर्थिक फटका रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसतो. वेळेवर रुग्णवाहिका तसेच अन्य वाहनांची सुविधा मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार होताना अडचणी निर्माण होतात. त्यामध्ये खडतर रस्ते, अरुंद रस्त्यांच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.

रस्ते अपघातात जखमी झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले, आत्महत्या केलेले, गंभीर आजाराने त्रस्त असलेले अशा वेगवेगळ्या कारणांमुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु करण्यात आली. रुग्णावर तातडीने उपचार व्हावे यासाठी सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखाली 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकामार्फत तातडीची वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये ही सेवा 2014 पासून सुरु झाली. रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून 23 रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिकेमध्ये अन्य आरोग्य सुविधांसह डॉक्टरही उपलब्ध करण्यात आले. 108 क्रमांकावर संपर्क साधल्यास काही मिनिटात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे काम केले जाते. बीव्हीजी कंपनीद्वारे या रुग्णवाहिकांवर नियंत्रण ठेवले जाते. रायगड जिल्ह्यात या कंपनीचा एक व्यवस्थापक म्हणून काम पाहात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये 108 रुग्णवाहिकेचे कामकाज चालत आहे. दर दिवशी रुग्णवाहिका सुमारे दोनशे किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. त्यात मुंबईला रुग्णांना नेणे, जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे, अशा अनेक प्रकारची कामे रुग्णवाहिकेच्या मदतीने केली जात आहेत. अकरा वर्षांमध्ये 108 रुग्णवाहिकेने एक लाख 50 हजार 127 रुग्णांना सेवा दिली आहे. त्यामध्ये भाजलेले, वाहन अपघात झालेले. आत्महत्या करणारे, गंभीर दुखापत झालेले, तसेच इतर वैद्यकिय मदतीसाठी तातडीने अन्य रुग्णालयात नेण्याचे काम रुग्णवाहिकेने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जीवनदायी म्हणून 108 रुग्णवाहिकेकडे पाहिले जाते.

रुग्णवाहिकेच्या सेवेवर दृष्टीक्षेप

वाहन अपघात - 8345

हल्ल्यात जखमी झालेले - 1017

भाजलेले - 885

वैद्यकीय मदतीसाठी असणारे - 1,30,433

आत्महत्या करणारे रुग्ण - 140

पडलेले - 3508

गंभीर दुखापत - 5798

एकूण - 1, 50, 126
नव्या रुग्णवाहिकांची प्रतीक्षा
इंजिन बंद पडणे, स्टेअरिंगची समस्या निर्माण होणे, असे अनेक प्रश्न रुग्णवाहिकेबाबत सुरु झाले आहेत. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिका जुन्या झाल्या असून, आतापर्यंत या रुग्णवाहिकांनी साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. लवकरच या रुग्णवाहिका भंगारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नव्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
Exit mobile version