रायगडात एक लाख हेक्टर खरीपाची लागवड

रायगड कृषि विभागाचे खरीप नियोजन पूर्ण

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात 1 लाख 1 हजार 510 हेक्टरवर यंदा खरीपाची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात, नागली आणि तूर पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची उत्पादकला वाढविण्यावर यंदा भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने तयारी पुर्ण केली आहे. रायगड जिल्ह्यात 98 हजार 487 हेक्टरवर भाताची लागवड केली जाणार आहे. तर 3 हजार 023 हेक्टरवर नागली लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी 90 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

खरिप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी देखील कामाला लागला आहे. मशागतीची कामे शेतकर्‍यांनी सुरु केली आहेत. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरु झाली आहेत. याशिवाय बांधबंदिस्ती, चर मारणे यासारखी कामेदेखील सुरु झाली आहेत.

शेती क्षेत्र घटतयं
जिल्ह्यात वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, शेतमजूरांची कमतरता यावेळी दरवर्षी भातलागवडीखालील शेती क्षेत्रात घट होत आहे. भात लागवडीचे क्षेत्र 1 लाख 24 हजार हेक्टरवरून 1 लाख 1 हजार हेक्टवर येऊन ठेपले आहे. शेती क्षेत्रातील घट चिंताजनक आहे. शेतकरी शेतीपासून दूरावत चालल्याचे यातून दिसून येत आहे.
Exit mobile version