अवकाळीने कांद्याच्या दरात तेजी; साठवणुकीचा माल खराब

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर होते, परंतु सोमवारी घाऊक बाजारात कांदा वधारला आहे. प्रतिकिलो मागे दरात कमीत कमी 5 रु ते जास्तीत जास्त 7 रुपयांनी वाढ झाली आहे. पावसामुळे साठवणुकीचे कांदे मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत. तर नवीन कांद्याना ही पावसाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे बाजारात उत्तम दर्जाचे कांदे कमी येत असल्याने ही दरवाढ होत असल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले आहे.

नवीन लाला कांदे अद्याप बाजारात दाखल होत नसल्याने तसेच साठवणूकीचे कांदे खराब होत आहेत. त्यामुळे कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसाने जुन्या आणि नवीन कांद्याला झळ बसत आहे, परिणामी ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये कांदा वधारत आहे. यावेळी ही मुसळधार पावसामुळे चाळीलीतील साठवणूकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणात सडलेला निघत आहे.

सोमवारी बाजारात कांद्याच्या 143 गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 80% कांदा खराब निघत आहे, तर अवघे 20% कांदा चांगला येत आहे. बाजारात उच्चतम दर्जाच्या कांद्याला जास्त मागणी आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रतिकिलो 15 रु ते 20 रुपयांवर स्थिर असलेल्या कांद्याच्या दरात आता 5 ते 7 रुपयांनी दरवाढ झाली आहे. कांद्याची दरवाढ झाल्याने गृहिणींना मात्र आर्थिक झळ बसणार आहे.

Exit mobile version