कमी संख्या आणि जास्त मागणीमुळे वाद
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये 26 डिसेंबर रोजी ई-रिक्षा धावू लागली आणि कमी वेळात लोकांच्या पसंतीला उतरली. कमी दर असल्यामुळे पर्यटकांसह नागरिकही याचा उपभोग घेत आहेत. ई-रिक्षासाठी पर्यटक आणि नागरिकांच्या रांगांच रांगा दिसत आहेत. शालेय विद्यार्थीही याचा आनंद घेत शाळेत जात आहेत. पंधरा दिवसांत शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत झाली आहे. तसेच पर्यटक आणि नागरिक ही मोठ्या प्रमाणात ई-रिक्षाचा वापर करत आहेत मात्र काही पर्यटक आणि नागरिकांना ई-रिक्षा उपलब्ध होत नसल्याने व यामुळे वाद होत असल्याने चालकांची मात्र चांगलीच पंचाईत होत आहे.
मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी कमी वेळात प्रक्रिया पूर्ण करून सनियंत्रण समितीच्या आदेशानुसार सात ई-रिक्षांना हिरवा कंदील दाखवला. मात्र, सातपैकी सहा रिक्षाच सुरू असून, विद्यार्थी आणि पर्यटक, नागरिकांना सेवा देत आहेत. पण, दिवसेंदिवस ई-रिक्षाची लोकप्रियता वाढत असल्याने सर्वांना सेवा देण्यास असमर्थता दिसत आहे.
सकाळी 6 वाजल्यापासून ई-रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याचे काम करीत आहेत. विद्यार्थी संख्या वाढल्याने त्यांना शाळेत वेळेत पोहोचविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पहिल्या प्रायोगिक तत्त्वावर ई-रिक्षा तीन महिन्यांसाठी धावल्या त्यावेळी विद्यार्थी संख्या 75 होती ती आता 275 झाली आहे.सेंट झेव्हीयर्स कॉन्व्हेंट शाळा तसेच प्राचार्य शांताराम गव्हाणकर विद्या मंदिर या शाळेत ही सेवा दिली जात आहे.या सेवेमुळे शाळेतील विद्यार्थी समाधानी असले तरी वेळेत शाळेत नेण्याकरिता चालकांची ससेहोलपट होत आहे. प्रथम या सेवेला प्राधान्य दिले जात आहे. सकाळी 11 नंतर एक रिक्षा पर्यटकांना सेवा देत असून, बाकी रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना आणण्यात गुंतलेल्या असतात. त्यामुळे सकाळी माथेरानमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग पर्यटकांची चांगलीच गोची होत आहे. विद्यार्थ्यांना ही काही वेळा ही सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. मात्र, तरीसुद्धा या रिक्षा शालेय विद्यार्थी आणि पर्यटकांना अपुरी का होईना, पण सेवा देत आहेत.
एक रिक्षा बंद अवस्थेत माथेरान नगरपालिकेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर सात रिक्षा सेवा देत होत्या.मार्च महिन्यापासून डिसेंबर पर्यंत त्या बंद अवस्थेत होत्या दरम्यान कुत्र्यांकडून सीट फाडल्या गेल्या.चार्जिंग क्षमता कमी झाली डिसेंबर मध्ये ई-रिक्षा सुरू करण्यासाठी त्या सर्व्हिसिंगला पाठविण्यात आल्या त्यापैकी सहा रिक्षा तयार होऊन आल्या एक मात्र बंद अवस्थेतच राहिली असल्याने फक्त सहा रिक्षाच सेवा देत आहेत.
ई-रिक्षा कमी असतानादेखील आम्ही विद्यार्थी, नागरिक, पर्यटक यांना सेवा देत आहोत. सध्या विद्यार्थी संख्या जास्त असून, त्यांना वेळेत शाळेत सोडणे ही आमची प्राथमिकता आहे. पर्यटक आणि नागरिकांना सेवा देताना रिक्षा कमी पडत आहेत, त्यामुळे आमच्या चालकांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
जे.डी. जाधव, ठेकेदार
स्थानिक हातरिक्षा चालकांच्या पदरी निराशाच श्रमिक हातरिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. पण नगरपालिकेने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. 26 डिसेंबरपासून ई-रिक्षा ठेकेदारामार्फत सुरू झाल्या. हातरिक्षा मालकांना वाटले होते की, हातरिक्षा सोडून आता ई-रिक्षा आम्ही चालवू. पण, पालिकेने ठेकेदाराला ठेका दिल्याने स्थानिक हातरिक्षा चालकांच्या पदरी निराशा आली आहे.
ई-रिक्षा सुरू करण्यासाठी जी 2023 साली प्रक्रिया राबविली गेली, तीच यापुढे सुरू असून, त्याच नियमाचे पालन करून ई-रिक्षा धावत आहेत. नवीन रिक्षा खरेदी करण्याचा अधिकार हा नगरपालिकेचा नसून, सनियंत्रण समितीचा आहे. त्यामुळे नगरपालिका नवीन रिक्षा खरेदी करणार या गोष्टीत तथ्य नाही.
अंकुश इचके, कार्यालयीन अधीक्षक
दरपत्रक 275 विद्यार्थी :- 5 रुपये प्रत्येक विद्यार्थी पर्यटक व नागरिक :- 35 रुपये प्रत्येकी (एका रिक्षात प्रत्येकी तीन प्रवासी प्रवास करतात)







