| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरानमधील सातपैकी तीनच ई-रिक्षा सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सनियंत्रण समितीने ई-रिक्षांची संख्या वाढवावी, अशी मागणी सुहासिनी शिंदे यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दि. 26 डिसेंबरपासून नगरपालिकेने पुन्हा सात ई-रिक्षांसोबत वाहतूक सुरू केली. मात्र, महिन्याभरापासून ई-रिक्षांमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने ई-रिक्षाची सेवाच कोलमडून गेली आहे. अवघ्या तीन ई-रिक्षा सुरू असल्याने स्थानिक रहिवासी, विद्यार्थी व पर्यटक यांना तासन तास ई-रिक्षासाठी वाट पाहावी लागत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हातरिक्षा चालकांनाच ई-रिक्षा द्याव्यात असा स्पष्ट आदेश दि. 10 जानेवारी रोजी दिला. याची अंमलबजावणीची जबाबदारी सनियंत्रण समितीकडे दिली आहे. असे असतानादेखील ठेकेदारच ई-रिक्षा चालवीत आहे, दि 10 जानेवारी रोजी आदेश प्राप्त होताच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी ई-रिक्षाची संख्या व मार्ग निश्चित करण्यासाठी पाच सदस्यीय कमिटी गठीत केली होती. या कमिटीने आठ हजार रहिवासी, विकेंडला येणारे चार ते पाच पर्यटक व 350 विद्यार्थी यांची गरज लक्षात घेता चाळीस ई-रिक्षांची सुरुवातीला परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला होता; परंतु सनियंत्रण समितीच्या काही सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सुरुवातीला 20 ई-रिक्षा हात रिक्षाचालकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाचीदेखील सनियंत्रण समिती अंमलबजावणी करीत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सुहासिनी दाभेकर, सामाजिक कार्यकर्त्या
शंभर वर्षांनंतर ई-रिक्षासारखी सुरू झालेली सेवा स्वस्त व अत्यंत सोयीची आहे. ई-रिक्षाची संख्या वाढवावी व चोवीस तास सेवा देण्यात यावी.
सुनील शिंदे
माथेरानमधील रस्ते खराब आहेत, पेव्हर ब्लॉकला मान्यता दिली तर रस्ते चांगले होतील आणि रिक्षा सुरळीत सुरू राहतील.