| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन-बोर्लीपंचतन-मीरज या मार्गावरती श्रीवर्धन आगारातून सकाळी बस सोडण्यात येते. ही बस दुसर्या दिवशी परतीच्या प्रवासासाठी मीरज-बोर्लीपंचतन-श्रीवर्धन अशी परत येते. ही बस महाड, महाबळेश्वर, वाई, सातारा, कराडमार्गे मीरज असा प्रवास करते. मात्र, श्रीवर्धन आगाराकडून या मार्गावरती नेहमी अत्यंत जुन्या व भंगार बसेसच सोडण्यात येत असत. सोमवारी मीरजहून ही बस बोर्लीपंचतनजवळ वडवली फाट्याजवळ आली असता बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस दहा फूट खोल खड्ड्यामध्ये पलटी झाली.
या बसमध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करत होते. यामधील वीस प्रवाशांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे. श्रीवर्धन आगारामध्ये नवीन बसेस उपलब्ध असताना लांब पल्ल्याच्या मार्गावरती जुनी व भंगार बस का सोडण्यात होती? याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. सदरची बस ही आंबेनळी घाट, महाबळेश्वर या अत्यंत कठीण व अवघड असलेल्या घाटामधून नियमित प्रवास करत असे.
अशा घाटामध्ये तांत्रिक बिघाड झाला असता तर मोठ्या प्रमाणावर बस अपघातग्रस्त होऊन जीवितहानीदेखील झाली असती. श्रीवर्धन आगारात असलेल्या लाल रंगाच्या बसेस या अगोदर निमआराम बस होत्या. या बसला काही वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाल रंग लावून ती एसटी महामंडळात वापरण्यात येते. श्रीवर्धन आगाराकडून मुंबई, बोरिवली, ठाणे, भाईंदर या मार्गावरती नवीन बस चालवल्या जातात. परंतु, मीरज या मार्गावरती नेहमीच जुनी बस देण्यात येत असे. तरी श्रीवर्धन आगाराने या ठिकाणी नवीन बस द्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.