वनविभागाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात पोश्री नदीवर बोरगाव येथे प्रस्तावित असलेल्या पोशीर धरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच विरोध असून, आता वनविभागाकडून झाडांची मोजणी सुरू झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबद्दल शेतकरी आक्रमक झाले असून वन विभागाच्या कार्यालयात एकत्र जमले होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोशीर धरणाच्या कामाला ब्रेक लागला आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी पोशीर नदीवर हे धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली असून, प्रकल्पामुळे कर्जत तालुक्यातील अनेक गावांमधील शेतजमीन, वनक्षेत्र आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, ज्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने वनविभागाच्या हद्दीतील झाडांची मोजणी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक शेतकऱ्यांनी कळंब येथील वनविभागाच्या कार्यालयात धाव घेतली. यावेळी पर्यावरणप्रेमी ॲड. कैलास मोरे, तानाजी चौधरी, भरत डोंगरे, रामदास पाटील, नंदकुमार खडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कर्जतचे वन अधिकारी निलेश भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असताना मोजणीचे काम कशासाठी सुरू करण्यात आले? असा सवाल उपस्थित केला आणि मोजणी तात्काळ थांबवण्याची मागणी केली. यावेळी पर्यावरणप्रेमी ॲड. कैलास मोरे यांनीही वन अधिकाऱ्यांसमोर प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि स्थानिकांचा विरोधाची कारणे सविस्तर मांडली.
पोशीर धरण प्रकल्पाला भागातील शेतकरी या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत. आमच्या जमिनी घेऊन विकास नको, अशी भूमिका घेत यापूर्वीही शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. त्यामुळे आता एकीकडे शासनाकडून पोशीर धरणाच्या हालचालींना वेग, तर दुसरीकडे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक शेतकरी पुन्हा आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
हे काम वरिष्ठ पातळीवरील आहे. तसेच या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक, अलिबाग यांच्याकडे आपल्या हरकती नोंदवावी.
निलेश भुजबळ
वन अधिकारी






