जिल्ह्यात होणार शाळाबाह्य मुलांचा शोध

गुरुजी म्हणतात, कुठे कुठे शोधू तुला

| अलिबाग | प्रतिनिधी |

शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम राबवली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील 3 ते 18 वयोगटातील मुलांचा शोध 17 ऑगस्टपासून घेतला जाणार आहे. पंधरा दिवस असणारी ही मोहीम 31 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या मोहिमेमुळे समस्त गुुरुजींवर शाळा बाह्य मुले शोधण्याची वेळ आली आहे. ते शोधताना कुठे, कुठे शोधू तुला असे म्हणण्याची वेळही त्यांच्यावर आली आहे.

रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजीटल शाळा, आय.एस.ओ. मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, नवोदय परिक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, मागास, वंचित, अल्पसंख्याक गटातील वस्त्या, सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था अशा अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आले आहे.

सहकार्य करण्याचे आवाहन
शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोध मोहीम अंतर्गत 3 ते 6 वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत. खाजगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजी मध्ये जात नाहीत व 6 ते 18 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोधमोहिम घेण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी केले आहे.

Exit mobile version