खालापूर तालुक्यात भातशेतीला बहर

शेतकरीवर्गामध्ये समाधान, शेतकरी कापणीच्या तयारीत
खोपोली । वार्ताहर ।
यावर्षी वरूण राजाने घातलेल्या थैमानाला तोंड देत शेतकरी राजाने आपल्या शेतात भात पिकाची लागवड केली. अनेक संकटे पुढे असतानाही या संकटाचा सामना करीत असताना गेल्या काही दिवसापासून वरूणराजा समाधानकारक आणि पुरेसा पडल्याने खालापूर तालुक्यातील भातशेती चांगलीच बहरल्याने भाताची कणसे तयार झाल्यामुळे शेतकरी राजा समाधान असल्याचा पहायला मिळत आहे.
गेले काही दिवस उसंत घेणारा वरूणराजा अधूनमधून पावसाच्या सरी व उबदार ऊन देत आहे. जास्त पाऊस नाही व जास्त उघडीप देखील नाही जणू कही उन पावसाचा खेळच चालू असल्यासारखे वातावरण सध्या अनुभवास मिळत आहे. ते भात शेतीला अत्यंत पोषक ठरत असल्याने भातशेती बहरू लागल्याने शेतकरी राजा समाधान व्यक्त करत आहे.
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात सर्वात जास्त तांदूळ पिक पिकवले जात असून भाताचे कोठार म्हणून तालुक्याची ओळख असल्याने गेल्या काही दिवसापासून तालुक्यात समाधानकारक वरूण राजा बसत असल्याने भातशेती बहरली असून बळीराजा समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतकर्‍यांनी कोलम, दप्तरी, रत्ना, जया, अवनी, वैष्णवी, कर्जत 3 अशा विविध प्रकारच्या जातीच्या भातपिकाची लागवड केली आहे. भातपिक बहरायला लागला असून भाताची कणसे फुलायला सुरूवात झाली असल्याने यापुढे ही असाच शेतीला पुरक असा वरूण राजा बरसावा अशी प्रतिक्रिया शेतकरी राजा व्यक्त करी आहे.

Exit mobile version