| नेरळ | प्रतिनिधी |
भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यात आज अनेक शेतकरी पावसाच्या लहरीपणामुळे चिंतेत आहेत. भाताची रोप अनेक ठिकाणी उशिरा आलेल्या पावसामुळे आणि नंतर सलग काही दिवस पाऊस झाल्याने भाताची रोपे संकटात आली आहेत. मात्र, काही भागात पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी मोटार वापरून शेतीला पाणी पुरवले आणि आपले शेतातील राभ जगवले आहेत. दरम्यान पाथरज परिसरात पाण्याची ठिकाणे असलेल्या शेतीमध्ये भाताची रोपांची लावणी देखील सुरू झाली आहे.
यावर्षी भाताचे कोठार असलेला कर्जत तालुका पावसाच्या लहरीपणामुळे संकटात आला आहे. भाताची रोपे बहुसंख्य ठिकाणी जून महिन्याचे अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातच आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीबाहेर आलीच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार भाताची बियाणे खरेदी करून रोप तयार करावी लागली आहेत. मात्र, तालुक्यातील प्रगत शेतकरी मोहन शिंगटे यांनी भाताची रोपे मोटारद्वारे पाणी घालून जगवली आहेत. आता ती रोपे चांगली तयार झाली असून, भाताच्या रोपांची लागवड देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या फार तुरळक ठिकाणी भाताची रोपे तयार झाली आहेत. त्यामुळे मजूर देखील सहज उपलब्ध होत असून, भाताची लागवड आपल्या शेतीत केली आहे. पाण्याचा अंदाज घेऊन ही रोपे लागवड करण्यासाठी शेतकरी मोहन शिंगटे यांच्या कुटुंबाने केली आहे. ही भाताची शेती कर्जत तालुक्यातील यावर्षीची पहिलीच लावणी असल्याचे बोलले जात आहे.
पाथरज परिसरात लावणी सुरू
