। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण सोमवारी ( दि.21) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील डॉ.हिम्मतराव बावस्कर यांच्यासह महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील चार मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. सायरस पुनावाला आणि एन.चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर डॉ.भिमसेन सिंघल, डॉ.विजयकुमार डोंगरे, डॉ.हिंमतराव बावस्कर तसेच डॉ.अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विंचुदंश आणि सर्पदंशावर केलेल्या अभ्यासासाठी डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन आज सन्मानित करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विंचुदंश आणि सर्पदंश झालेल्यांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत आज त्यांना नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.