। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड तालुक्यात दि.22 जुलै 2021 रोजी अतिवृष्टी होवून मौजे तळीये येथे दरड कोसळल्याने एकूण 87 व्यक्ती मयत व 2 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. तसेच अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील काही गावात दरडी व जमिनीला भेगा पडलेल्या होत्या. महाड तालुक्यात 48 दरडग्रस्त गावे होती व नव्याने 24 संवेदनशील गावाचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशा एकूण 72 दरडग्रस्त गावांचा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागामार्फत अहवाल प्राप्त झाला आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने सुचविलेल्या शिफारशीनुसार दरडग्रस्त गावांचे सविस्तर अहवाल (DPR) तयार करण्यात आलेला असून दरडग्रस्त गावांचा सविस्तर अहवाल (DPR) मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील दरडग्रस्त संवेदनशील 72 गावांचा सर्व शासकिय यंत्रणांसमवेत दि.12 जानेवारी 2022 ते दि.02 फेब्रुवारी 2022 या दरम्यान संयुक्त स्थळ पाहणी दौरा महाड उपविभागीय अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आला असून त्यानुसार पाहणी दौऱ्यामधील स्थानिक लोकांच्या निरीक्षणानुसार करावयाच्या अंमलबजावणीबाबतही सर्व शासकीय यंत्रणांना सूचित करण्यात आले आहे. तसेच दरडग्रस्त गावांचे तात्पुरते निवारागृह व कायम पुर्नवसन करन्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आवश्यक प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.तालुक्यातील अन्य कायमस्वरुपी पुनर्वसन करणे आवश्यक असणारी काही गावे मोहोत (भिसेवाडी, सुतारवाडी), कोथेरी-जंगमवाडी, कोचेरी-तांदळेकरवाडी, मोरेवाडी (शिगरकोंड), लोअर तुडील (नामवलेकोंड), रुपवली (बौध्दवाडी) यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
या पावसाळ्यात दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांमध्ये कायमस्वरुपी निवारा शेड होणे शक्य नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यासाठी गावामधील शाळा/सभामंडप/मंदिर/समाजमंदिर निश्चित करण्यात आले असून आवश्यक तेथे सोयीसुविधा देण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करण्याचेही प्रस्तावित केले आहे व पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्यात येणार आहेत.
तसेच या एकूण 72 गावात दरडीचा धोका उद्भवू नये व योग्य वेळी खबरदारी घेण्याकरिता ग्रामस्थांना सूचित करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय जनजागृती कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलीस पाटील, आशासेविका यांना सहभागी करून घेतलेले असून त्यांना गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जावून आपत्ती कालावधीत घ्यावयाच्या खबरदारीच्या सूचना देण्याकरिता प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यानुसार हा कार्यक्रम मे 2022 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच तात्पुरते स्थलांतर करण्याची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार गावनिहाय त्या ठिकाणांची यादी पुढीलप्रमाणे आहे.